

पावसाळा सुरू झाला की वातावरणात गारवा जाणवतो. मात्र या ऋतूमध्ये आरोग्याच्या काही समस्या डोकं वर काढतात. त्यात पोटाशी संबंधित तक्रारींचं प्रमाणही वाढताना दिसतं. वातावरणातील वाढलेली आर्द्रता, अस्वच्छता, दूषित पाणी आणि खाण्यापिण्यात झालेली छोटीशी चूक यामुळे पोटदुखी, गॅस, अपचन, उलट्या, जुलाब आणि पोटाचे संसर्ग होऊ शकतात.
तुम्हालाही पावसाळ्यात वारंवार पोटदुखी किंवा पोटाशी संबंधित त्रास होत असेल, तर त्यामागे ही काही कारणं असू शकतात.
पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचतं आणि अस्वच्छतेचं प्रमाण वाढतं. त्यामुळे पिण्याचं पाणी किंवा खाद्यपदार्थ दूषित होण्याची शक्यता वाढते. अशा पाण्यातून किंवा अन्नातून बॅक्टेरिया आणि विषाणू शरीरात गेल्यास पोटदुखी, जुलाब आणि उलट्या होऊ शकतात.
पावसाळ्यात काही लोकांची पचनशक्ती नेहमीपेक्षा थोडी कमजोर होते. अशावेळी खूप तेलकट, तिखट, मसालेदार किंवा जड पदार्थ खाल्ल्यास पचनाचा त्रास होऊ शकतो. यामुळे गॅस, अपचन, पोट फुगणं आणि पोटात कळ येणं अशा समस्या निर्माण होतात. काही वेळा या त्रासामुळे पोटदुखीही सुरू होऊ शकते.
पावसाळ्यात हवेत आर्द्रता जास्त असते. त्यामुळे शिजवलेलं किंवा उघड्यावर ठेवलेलं अन्न इतर दिवसांच्या तुलनेत लवकर खराब होऊ शकतं. असं खराब अन्न खाल्ल्यास फूड पॉइझनिंग होण्याचा धोका वाढतो. फूड पॉइझनिंग झाल्यास पोटात तीव्र वेदना, उलट्या आणि अशक्तपणा जाणवू शकतो. त्यामुळे शिजवलेलं अन्न जास्त वेळ ठेवणं आणि खराब झालेलं अन्न खाणं टाळणं महत्त्वाचं आहे.
पावसाळ्यात बॅक्टेरिया आणि त्यांचा प्रसार वाढण्याची शक्यता असते. अस्वच्छ हात, दूषित पाणी किंवा खराब अन्नाच्या माध्यमातून हे जंतू शरीरात प्रवेश करू शकतात. यामुळे पोटाच्या आतील भागाला संसर्ग होऊ शकतो आणि पोटदुखीची समस्या सुरू होऊ शकते. काही जणांना हा त्रास सतत जाणवू शकतो. त्यामुळे जेवण्यापूर्वी आणि अन्न हाताळण्यापूर्वी हात स्वच्छ धुणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
पावसाळ्यात माशा आणि इतर कीटकांचं प्रमाण वाढतं. हे कीटक अस्वच्छ ठिकाणी बसल्यानंतर अन्नावर बसले, तर त्यांच्या माध्यमातून हानिकारक जंतू अन्नात जाऊ शकतात. असं उघडं किंवा दूषित अन्न खाल्ल्यास पोटाचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते आणि त्यानंतर पोटदुखी, उलट्या किंवा इतर पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
हवामान किंवा ऋतु बदलला की काही लोकांच्या आतड्यांची सेंसेटीव्हीटी वाढू शकते. अशावेळी जेवणाच्या वेळा अनियमित असणं, कमी पाणी पिणं आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणं यामुळे पोटदुखीचा त्रास आणखी वाढू शकतो. त्यामुळे पावसाळ्यात काही साध्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.
शक्यतो नेहमी ताजं अन्न खा, पुरेसं आणि स्वच्छ पाणी प्या. बाहेरचं अस्वच्छ किंवा उघड्यावर ठेवलेलं अन्न खाणं टाळा. जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवा आणि अन्न झाकून ठेवण्याची सवय लावा. पोटदुखी वारंवार होत असेल, खूप तीव्र वेदना होत असतील किंवा उलटी-जुलाबासारखी लक्षणं सतत जाणवत असतील, तर दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरेल.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.