
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा आणि आनंदाचा सण. हा सण कार्तिक महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जातो. दरवर्षी दिवाळीत लक्ष्मी मातेची आणि गणेशाची पूजा केली जाते. धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी विधीनुसार पूजा केल्यास लक्ष्मी माता प्रसन्न होतात आणि घरात सुख, समृद्धी व धनाचा आशीर्वाद देतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की दिवाळीच्या रात्री आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपले घराचे दरवाजे उघडे का ठेवतात? यामागे एक सुंदर पौराणिक कथा सांगितली जाते.
असं मानलं जातं की दिवाळीच्या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करतात. त्या अशा घरात प्रवेश करतात जे स्वच्छ, प्रकाशमान आणि श्रद्धेने भरलेले असतात. त्यामुळे माता लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांना घरात प्रवेश देण्यासाठी लोक आपले दरवाजे उघडे ठेवतात. असंही म्हटलं जातं की देवी-देवता अंधाऱ्या आणि अस्वच्छ घरात प्रवेश करत नाहीत, म्हणून दीप लावणे आणि दरवाजे उघडे ठेवणे हे लक्ष्मीस्वागताचे प्रतीक आहे.
पौराणिक कथेनुसार, एकदा कार्तिक अमावस्येच्या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर फिरायला आल्या. त्या वेळी सगळीकडे अंधार होता आणि त्या मार्ग चुकल्या. त्यांनी ठरवलं की त्या रात्र मृत्युलोकातच घालवायची. त्या प्रत्येक घराच्या दाराशी गेल्या, पण सर्व दरवाजे बंद होते. मात्र एका वृद्ध स्त्रीच्या घराचे दार उघडे होते. तिने दीप लावलेला होता आणि ती कामात गुंतलेली होती. माता लक्ष्मीने तिच्याकडे आश्रय मागितला आणि ती रात्र तिथेच थांबल्या.
सकाळी ती वृद्ध स्त्री जागी झाली तेव्हा तिचं घर सोन्या-रत्नांनी सजलेलं महाल झालं होतं. तिला कळलं की तिच्या घरात आलेली अतिथी म्हणजे स्वतः माता लक्ष्मी होत्या. तेव्हापासूनच ही परंपरा सुरू झाली की दिवाळीच्या रात्री घराचे दरवाजे उघडे ठेवावेत, ज्यामुळे माता लक्ष्मी घरात प्रवेश करून आपल्या भक्तांना संपत्ती, सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देतील. आजही लोक घरात दिवे लावून उजेड पसरवतात आणि लक्ष्मी देवीच्या आगमनाची प्रतीक्षा करतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.