

दर काही महिन्यांनी कॅन्सरच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचं सांगणारा एखादा नवा रिपोर्ट समोर येतो. त्यानंतर कॅन्सर वाढण्यामागची कारणं काय, यावर चर्चा सुरू होते. प्रदूषण, साखर, प्लास्टिक, ताणतणाव, मोबाईलचा वापर आणि प्रोसेस्ड फूड यांसारख्या अनेक गोष्टींना यासाठी जबाबदार धरलं जातं. यातील काही गोष्टींचा कॅन्सरच्या धोक्याशी संबंध नक्कीच आहे. मात्र कॅन्सरच्या वाढत्या प्रमाणामागे यापेक्षाही मोठं आणि व्यापक कारण आहे.
तज्ज्ञांच्या मते, कॅन्सरचं प्रमाण एखाद्या एका मोठ्या बदलामुळे वाढत नाही. गेल्या काही दशकांत आपल्या जगण्याच्या पद्धतीत अनेक छोटे-मोठे बदल झालेत आणि त्याचा एकत्रित परिणाम आपल्या शरीरावर होत आहे.
काही दशकांपूर्वीपर्यंत संसर्गजन्य आजारांमुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा अकाली मृत्यू होत होता. स्वच्छता, लसीकरण आणि अँटिबायोटिक्स यांसारख्या वैद्यकीय प्रगतीमुळे आज माणूस पूर्वीपेक्षा जास्त काळ जगतो आहे. वैद्यकीय क्षेत्राचं हे मोठं यश आहे. मात्र आयुष्य वाढल्याचा एक परिणाम असा झाला की, वय वाढल्यानंतर होणारे आजारही अधिक दिसू लागले. कॅन्सर हा प्रामुख्याने वाढत्या वयाशी संबंधित आजार आहे.
गेल्या काही दशकांत वातावरण आणि जीवनशैली अतिशय वेगाने बदलली आहे. पूर्वीच्या तुलनेत आज आपली शारीरिक हालचाल कमी झालीये. दिवसभर बसून काम करणं, व्यायामासाठी वेळ न देणं आणि सतत स्क्रीनसमोर राहणं ही जीवनशैली सामान्य झाली आहे. खाण्यापिण्याच्या सवयींमध्येही मोठा बदल झाला आहे. पूर्वी तुलनेने नैसर्गिक आणि कमी प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ले जायचे. आता पॅकेज्ड आणि अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
पूर्वी लवकर झोपण्याची सवय होती मात्र आता झोपेची वेळही बदलली आहे. रात्री उशिरापर्यंत मोबाईल, टीव्ही किंवा इतर स्क्रीनचा वापर केला जातो. या सगळ्या बदलांचा शरीरावर परिणाम होतो. शरीरात दीर्घकाळ राहणारी सूज म्हणजेच क्रोनिक इन्फ्लेमेशन, वाढतं वजन, हार्मोन्समधील बदल आणि शरीरातील मेटाबॉलिझमशी संबंधित समस्या यांचं प्रमाण वाढत आहे. या सर्व गोष्टी काही प्रकारच्या कॅन्सरचा धोका वाढवू शकतात.
कॅन्सरच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचा अर्थ प्रत्येक बाबतीत परिस्थिती बिघडतेय, असं नाही. वैद्यकीय क्षेत्रात झालेली प्रगती हे देखील त्यामागचं एक कारण आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), मॉलिक्युलर डायग्नोस्टिक्स, अत्याधुनिक इमेजिंग, आधुनिक पॅथॉलॉजी आणि कॅन्सरबाबत वाढलेली जनजागृती यामुळे पूर्वी लक्षात न येणारे अनेक कॅन्सर आता लवकर शोधले जात आहेत.
कॅन्सरचं लवकर निदान झाल्यास उपचाराचा परिणाम मोठ्या प्रमाणात बदलू शकतो. त्यामुळे आज अधिक कॅन्सर सापडत आहेत ही गोष्ट काही प्रमाणात वैद्यकीय प्रगतीचंही लक्षण आहे. मात्र यासोबत एक गंभीर समस्या अजूनही आहे. अनेक रुग्ण शरीरात दिसणारी लक्षणं अनेक महिने दुर्लक्षित करतात आणि आजार वाढल्यानंतर डॉक्टरांकडे येतात. त्यामुळे कॅन्सरचं लवकर निदान होणं हे आजही मोठं आव्हान आहे.
डॉक्टरांच्या मते, गेल्या काही वर्षांत त्यांना जाणवलेला सर्वात मोठा बदल हा केवळ तंत्रज्ञानात झालेला नाही तर लोकांमध्ये माहिती आणि जागरूकता वाढण्यातही झाला आहे. आज कॅन्सरच्या उपचारांमध्ये प्रिसिजन मेडिसिन, रोबोटिक सर्जरी, मॉलिक्युलर प्रोफाइलिंग आणि रुग्णाच्या गरजेनुसार उपचार करण्याच्या पद्धतींचा वापर वाढला आहे.
याशिवाय सोशल मीडियावर किंवा इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवण्याचीही समस्या आहे. काही रुग्ण बायोप्सी करण्यास उशीर करतात. काही जण डॉक्टरांचा सल्ला घेण्याऐवजी कुणी दिलेल्या अप्रमाणित उपचारांचा आधार घेतात. तर काही जण वैज्ञानिक आधार नसलेल्या पर्यायी उपचारांमध्ये महत्त्वाचा वेळ घालवतात.
कॅन्सरच्या बाबतीत वेळ खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे योग्य निदान आणि उपचार सुरू करण्यात होणारा प्रत्येक अनावश्यक उशीर रुग्णासाठी नुकसानकारक ठरू शकतो.
कॅन्सरचं वाढतं प्रमाण म्हणजे केवळ रुग्णांची संख्या वाढणं नाही. या रुग्णांना आवश्यक उपचार देण्यासाठी आरोग्य व्यवस्थाही सक्षम असणं गरजेचं आहे. कॅन्सरच्या उपचारासाठी प्रत्येक रुग्णाला एकाच डॉक्टरची मदत पुरेशी नसते.
त्यामुळे भविष्यातील आव्हान केवळ कॅन्सरवर उपचार करण्याचं नसेल. देशाच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या रुग्णाला योग्य वेळी योग्य तज्ज्ञ उपचार मिळतील याची खात्री करणंही तितकंच महत्त्वाचं असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.