

पहिले एक वर्ष बाळाला पालकांसोबत त्याच खोलीत झोपवणं आवश्यक आहे.
१ ते ३ वर्षांत मुलांना भावनिक आधाराची जास्त गरज असते.
३ ते ६ वर्षे हा स्वतंत्र झोपेची सवय लावण्यासाठी योग्य काळ आहे.
लहान मुलांना प्रत्येक आईवडील किमान शाळेत जाईपर्यंत बाजूला घेऊन झोपतात. मग काही दिवसांनी त्यांना वेगळ्या खोलीत झोपवतात. जर मुलांना वेगळं झोपण्याची सवय वेळीच नाही लावली तर त्यांना भविष्यात एकटं राहताना अनेक समस्यांना सामोरं जावं लागेल. पुढे आपण मुलं वाढवताना पिडीयाटिशिअनचा सल्ला घेणं किंवा काही सल्ले पाळणं हे मुलांच्या आयुष्यासाठी महत्वाचे ठरू शकते.
प्रत्येकाचे मुलं वेगळे असते आणि त्यांची भावनिक गरजही वेगळी असते. त्यामुळे सर्वांसाठी एकसारखा नियम लागू होत नाही. त्यामुळे काही वेगळे उपाय करून पाहणं हे सुद्धा मुलांच्या वाढीसाठी गरजेचे असते.
डॉक्टरांच्या मते, पहिले एक वर्ष हे बाळासाठी सर्वात नाजूक असतं. या काळात त्याला आई-वडिलांची जास्तीत जास्त सुरक्षा, लक्ष आणि देखरेख आवश्यक असते. त्यामुळे एक वर्षापर्यंत बाळाला आई-वडिलांसोबतच त्याच खोलीत झोपवणं योग्य ठरतं. यामुळे रात्री बाळाची काळजी घेणे सोपं होतं आणि त्याच्या सुरक्षेची खात्रीही राहते.
१ ते ३ वयोगटातील मुले भावनिकदृष्ट्या अजूनही खूप जोडलेली असतात. त्यांना रात्री भीती वाटू शकते, ते अचानक जागे होऊ शकतात किंवा आई-वडिलांच्या जवळ राहण्याची गरज भासू शकते. त्यामुळे या वयातही मुलांना पालकांच्या खोलीत झोपवणं जास्त सोयीस्कर आणि योग्य ठरते.
यानंतर ३ ते ६ वर्षांचा काळ हा बदलाचा असतो. या वयात मुले आपली ओळख, स्वतःची जागा आणि स्वतंत्रता समजायला लागतात. त्यामुळे या वयात पालकांनी मुलांशी प्रेमाने व संवादातून त्यांना वेगळ्या बेडवर किंवा हळूहळू वेगळ्या खोलीत झोपण्यास तयार करायला हवे. मात्र हा बदल जबरदस्तीने करू नये. मुलाला सुरक्षित आणि आरामदायक वाटेल अशा पद्धतीनेच हा प्रवास घ्यावा, असे डॉक्टर सुचवतात.
तज्ज्ञ सांगतात की, ६ वर्षांनंतर, जर मूल आणि पालक दोघेही तयार असतील, तर मुलाला वेगळ्या खोलीत झोपवणे पूर्णपणे योग्य आहे. या वयात मुलांची समज, आत्मनिर्भरता आणि भावनिक स्थैर्य वाढू लागते. मात्र, मुलाला भीती वाटत असेल, तो वारंवार पालकांकडे पळत असेल किंवा रडत असेल, तर त्याला अजून वेळ देणे आवश्यक आहे. डॉक्टरांचे स्पष्ट मत आहे की मुलावर कधीही दबाव आणू नये. वेगळे झोपवणे हा नैसर्गिक आणि आरामदायक बदल असायला हवा. सामाजिक दबावामुळे किंवा इतरांच्या मतामुळे त्वरीत निर्णय घेऊ नये. शेवटी मुलाच्या मानसिक, भावनिक गरजा आणि पालकांची सोय दोन्ही लक्षात घेऊनच योग्य वेळ निश्चित करावी.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.