

महिला असो वा पुरुष दोघेही सध्या धावत्या जीवनशैलीचा भाग झालेले आहेत. त्यात काम, प्रवास, घरातली चिंता, मुलाबाळांचे शिक्षण अशा सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पुरुषांना किरकोळ वाटणाऱ्या समस्यांना दुर्लक्षित करणे. पुरुष जर शरीरातल्या काही किरकोळ वाटणाऱ्या समस्यांना दुर्लक्षित करत असतील तर त्यांना भविष्यात जीवघेण्या आजारांना सामोरं जावं लागू शकतं. त्यामध्ये कॅन्सरच्या आजाराह समावेश असू शकतो. पुढे आपण याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.
शरीरात वयानुसार होणारे बदल, थकवा किंवा वेदना सामान्य वाटतात. पण या लक्षणांची वाढ झाल्याने कॅन्सरचाही धोका वाढतो. तज्ज्ञांच्या मते, पाठदुखी, सततचा थकवा जाणवणे, वजन कमी होणे आणि गळ्याचा त्रास ही काही लक्षणे सामान्य नसून कॅन्सरच्या सुरुवातीची चिन्हे असू शकतात. पाठदुखीला अनेकदा स्नायूंचा ताण किंवा वय वाढल्यामुळे होणारा त्रास मानले जातं. पण जर हा त्रास सतत राहिला, रात्री वाढला किंवा कोणत्याही उपचारानंतरही कमी झाला नाही, तर त्याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. अशा वेदना विशेषतः हाडांमध्ये किंवा शरीराच्या इतर भागांत पसरत असतील, तर ती कॅन्सरची शक्यता दर्शवू शकतात.
सतत जाणवणारा थकवा हेही एक दुर्लक्षित केले जाणारे पण महत्त्वाचे लक्षण आहे. पुरेशी झोप, आहार आणि विश्रांती घेतल्यानंतरही थकवा जाणवत असेल तर शरीरातील कॅन्सर पेशी ऊर्जेचा वापर करत असल्याची शक्यता असते. जर थकव्याबरोबर वजन कमी, हलका ताप किंवा शरीरात वेदना अशी लक्षणे दिसत असतील, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
वजन कमी होणेही एक गंभीर इशारा असू शकतो. जर डाएट, व्यायाम किंवा जीवनशैलीत कोणताही बदल न करता वजन अचानक कमी होत असेल, तर ते पॅन्क्रियाज, फुफ्फुसे, पोट किंवा अन्ननलिकेशी संबंधित कॅन्सरचे संकेत असू शकतात. मात्र ताणतणाव, हार्मोनल बदल किंवा इतर कारणांनीही वजन कमी होऊ शकते.
गळ्याचा त्रास हा सर्दी-खोकल्यासारखा वाटू शकतो. पण जर तो तीन आठवड्यांपेक्षा जास्त वेळ टिकत असेल तर ते गळ्याच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते. गळ्याला वेदना, आवाज बसणे, गिळताना त्रास होणे किंवा कानात वेदना जाणवणे ही त्याची इतर सामान्य लक्षणे आहेत.
शरीर नेहमी काही ना काही संकेत देत असते, पण आपण ते किती लवकर ओळखतो यावरच उपचाराचा यश अवलंबून असतो. कोणतेही असामान्य लक्षण सतत राहिल्यास किंवा वाढत असल्यास, ते दुर्लक्ष न करता तात्काळ डॉक्टरांकडे जावे. कारण कॅन्सरचा प्रारंभिक टप्प्यात उपचार केल्यासच जीव वाचवता येतो आणि आयुष्य वाढवता येते.
टीप
हा लेख केवळ माहितीपर आहे. कोणत्याही लक्षणांबाबत शंका असल्यास किंवा ते दीर्घकाळ टिकत असल्यास तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.