समाजात मानसिक आरोग्याविषयी अजूनही अज्ञान आणि असंवेदनशीलता आहे.
पॅनिक अटॅक आणि चिंता यातील फरक समजून घेणे आवश्यक आहे.
कोविडनंतर भारतात पॅनिक अटॅकचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
"मेंटल फर्स्ट एड" ही काळाची गरज असून समाजाने यासाठी जागरूक व्हायला हवे.
शाळा, घरी किंवा इतर सामाजिक ठिकाणी लहान जखमा किंवा अपघात झाल्यास काय करावे हे सर्वांना माहीत असते. रक्त थांबवण्यासाठी काय करावे, भाजल्यावर कशा प्रकारे प्रथमोपचार करावा, अपघातानंतर रुग्णाला सुरक्षित कसे ठेवावे याविषयी आपल्याला लहानपणापासूनच शिकवले जाते. मात्र मानसिक आरोग्याचा विचार केला तर त्याविषयीचे संभाषण मात्र खूपच मर्यादित असल्याचे दिसून येते.
पॅनिक अटॅक, ऍन्क्झायटी, डिप्रेशन किंवा मानसिक ताण यांचा सामना करताना काय करावे हे क्वचितच लोकांना माहीत असते. एखाद्या व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होणे, घाम फुटणे, हृदयाची धडधड वाढणे, भीतीची तीव्र लाट जाणवणे हे लक्षणे पॅनिक अटॅकची असू शकतात, मात्र बऱ्याच लोकांना ही माहिती नसते. याउलट "चिंता" हा शब्द सर्वसाधारणपणे वापरला जातो आणि पॅनिक अटॅकशी गल्लत केली जाते.
डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल ऑफ मेंटल डिसऑर्डर्स (DSM) नुसार "ऍन्क्झायटी अटॅक" हा वैद्यकीय शब्द मान्यच नाही. चिंता म्हणजे सततची काळजी, अस्वस्थता किंवा तणावाची भावना, तर पॅनिक अटॅक ही अचानक येणारी तीव्र भीतीची अवस्था आहे. हे समजणे खूप महत्त्वाचे आहे, कारण योग्य समज नसल्याने अनेकदा चुकीच्या प्रतिक्रिया दिल्या जातात.
कोविड-१९ महामारीनंतर या समस्यांमध्ये वाढ झाल्याचे तज्ज्ञ सांगतात. भारतात पॅनिक अटॅकचे प्रमाण २३.७ टक्क्यांवरून ३५ टक्क्यांपर्यंत वाढले आहे, जे जागतिक स्तरावरील प्रवाहाशी सुसंगत आहे. ताणतणाव, असुरक्षितता, नोकरी गमावण्याची भीती, एकाकीपणा अशा अनेक कारणांमुळे ही वाढ झाली आहे. आजच्या घडीला "anxiety", "stress", "panic" किंवा "depression" हे शब्द संभाषणात सहज येतात, परंतु त्यांचे वेगवेगळे अर्थ असूनही सामान्य लोक त्यांचा एकमेकांसाठी वापर करतात.
मानसिक आरोग्याची जाणीव वाढवणे, त्याबाबत योग्य शिक्षण देणे आणि "mental first aid" सारखा संकल्पना विकसित करणे आता काळाची गरज ठरत आहे. जसे रक्तस्राव झालेल्या व्यक्तीला आपण त्वरित मदत करतो, तसेच पॅनिक अटॅक किंवा तीव्र चिंतेच्या स्थितीत अडकलेल्या व्यक्तीसाठी त्वरित आणि योग्य प्रतिसाद आवश्यक आहे. योग्य श्वसन तंत्र, शांत संवाद, सुरक्षित जागा उपलब्ध करून देणे, त्याला आधार देणे अशा छोट्या गोष्टी मोठा फरक करू शकतात.
मानसिक आरोग्यविषयक समस्या आता समाजाच्या पटलावर आल्या असल्या तरी त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अजूनही पारंपरिक आहे. अनेकदा या समस्या "कमजोरी" म्हणून पाहिल्या जातात आणि त्यामुळे रुग्ण आणखी एकाकी पडतो. या मानसिक आरोग्याच्या आव्हानांचा योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने सामना करण्यासाठी जागरूकता, संवेदनशीलता आणि संरचित प्रोटोकॉलची गरज असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.