

सध्या अनेक महिला आणि पुरुष रात्रंदिवस मेहनत करुन छान लाइफस्टाइल जगण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे अनेकाचं खाण्यापिण्याकडे लक्ष राहत नाही. लोक कामासाठी घराबाहेर बराचवेळ राहतात आणि काही तासांसाठी म्हणजेच झोपण्यापुर्ती घरी जातात. पण याचा परिणाम तुमच्या ह्रदयावर होतो आणि तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो.
त्यातच WHOच्या मते हार्ट अटॅकने अनेक तरुण मंडळीचा जागीच जीव जात असल्याची माहिती मिळाली आहे. जर वेळेवर लक्षणं ओळखून बदल केले तर तुम्ही स्वत: तुमच्या कुटुंबासोबत एक हेल्दी जीवनशैली जगू शकता. पुढील बातमीत आपण याची लक्षणे आणि काही शरीरातल्या बदलांबद्दल जाणून घेणार आहोत.
हार्ट अटॅक म्हणजेच मायोकार्डियल इन्फार्क्शन ही एक गंभीर आणि जीवघेणी अवस्था असते. जेव्हा हृदयाच्या स्नायूंना पुरेसा रक्तपुरवठा होत नाही तेव्हा ही स्थिती उद्भवते. यामध्ये रक्तप्रवाहात अडथळा आल्यामुळे हृदयाचे स्नायू हळूहळू निकामी होतात. यावर योग्य वेळी उपचार झाले नाही तर हृदयाला कायमस्वरूपी इजा होऊ शकते किंवा मृत्यूला सामोरं जावं लागू शकतं.
तज्ज्ञांच्या मते, हार्ट अटॅकची काही धोक्याची लक्षणं सकाळच्या वेळेत दिसतात. यामागचं कारण म्हणजे शरीराचं सर्केडियन रिदम आहे. सकाळी उठल्यानंतर रक्तदाब वाढतो, हार्मोन्समध्ये बदल होतात आणि हृदयावर ताण वाढतो. त्यामुळे अनेक लोकांना सकाळच्या वेळेत हृदयाशी संबंधित त्रास जाणवू लागतो.
सकाळी उठल्यानंतर छातीत दुखतं, जळजळ, घट्टपणा किंवा दुखणं जाणवू शकतं. हा त्रास काही मिनिटं टिकतो किंवा मधूनमधून येत राहतो. सकाळी कोर्टिसोलसारख्या हार्मोन्सचं प्रमाण वाढल्यामुळे रक्तवाहिन्यांमधला प्लॅक तुटण्याचा धोका वाढतो आणि त्यामुळे छातीत दुखायला सुरुवात होते.
काही लोकांना उठताच श्वास घ्यायला त्रास होतो. अगदी साधं काम करतानादेखील, जसं की अंथरुणातून उठणं, थकवा जाणवतो किंवा चालल्याने दम लागतो. छातीत दुखणं नसलं तरी श्वास लागणं हे हार्ट अटॅकचं लपलेलं लक्षण असू शकतं. विशेषतः महिलांमध्ये हा त्रास जास्त असतो.
काही वेळा सकाळी मळमळ, उलटी किंवा अपचनासारख्या समस्या जाणवतात. अनेकजण याला गॅस किंवा अॅसिडिटी समजून दुर्लक्ष करतात. सकाळी उठल्यावर अचानक थंड घाम येणं हेही धोक्याचं संकेत असू शकतं. तसंच उठताना चक्कर येणं किंवा भोवळ येण्यासारखं वाटणं रक्तदाब अचानक कमी झाल्याचं लक्षण असू शकतं. विशेषतः 40 वर्षांवरील लोकांमध्ये हे लक्षण हार्ट अटॅकपूर्वी दिसू शकतं. त्यामुळे वरीलपैकी कोणतीही लक्षणं जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे. वेळेवर उपचार घेतल्यास अनेकांचा जीव वाचू शकतो.
Disclaimer: या बातमीत दिलेली माहिती केवळ सामान्य जनजागृतीसाठी आहे. ती कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. कोणताही त्रास जाणवल्यास तात्काळ तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या माहितीबाबत साम टीव्ही कोणतीही जबाबदारी घेत नाही.