

कॅन्सर हा शब्द ऐकताच अनेकांच्या मनात एक वेगळीच भीती निर्माण होते. अनेकजण लगेच मृत्यूची कल्पना करूनही मोकळे होतात. परंतु लोकांच्या मनात असलेली ही भीती स्वाभाविक असली आहे. पूर्वीच्या काळात कॅन्सर न बरा होणारा आजार मानला जात होता. पण आता परिस्थिती बदलली आहे. आधुनिक उपचार पद्धतींमुळे बहुतेक कॅन्सर रुग्ण पुन्हा चांगलं आयुष्य जगू शकतात.
कॅन्सरबाबत सर्वात मोठं आव्हान म्हणजे आजार उशिरा लक्षात येणं. अनेक वेळा कॅन्सरचं निदान उशीरा होतं आणि तो शरीरात राहतो. अशावेळी रुग्ण काही लक्षणांकडे गांभीर्याने पाहत नाहीत. शरीरात गाठ दिसणं, असामान्य रक्तस्त्राव, अचानक वजन कमी होणं, शौचास त्रास होणं अशी लक्षणं दिसू शकतात.
यानंतर अजून एक होणारी समस्या म्हणजे उशीरा निदानामुळे मिळणारे उशीरा उपचार. यामुळे कॅन्सर सुरुवातीच्या टप्प्यात ओळखण्याची संधी निघून जाते आणि आजार पुढच्या स्टेजमध्ये अवस्थेत पोहोचतो. ज्यामुळे उपचार अधिक कठीण आणि गुंतागुंतीचे होऊ लागतात.
नवी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रूग्णालयातील रेडिएशन ऑन्कोलॉजी डॉ. दीपक डंगवाल यांनी सांगितलं की, या आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास बरं होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. स्तनाच्या कॅन्सरमध्ये शस्त्रक्रिया, त्यानंतर केमोथेरपी, रेडिएशन आणि इतर उपचार केल्यास बरं होण्याचं प्रमाण खूप जास्त असतं. त्याचप्रमाणे पॅप स्मिअर आणि HPV चाचण्यांद्वारे सर्व्हायल कॅन्सर टाळता येतो किंवा सुरुवातीला लक्षात येतो. ज्यावर शस्त्रक्रिया किंवा रेडिएशनने कमी दुष्परिणामांसह उपचार करता येतात.
डॉ. दीपक पुढे म्हणतात की, कोलन, तोंड आणि प्रोस्टेट कॅन्सरही सुरुवातीच्या टप्प्यात ओळखल्यास अधिक प्रभावीपणे त्यावर उपचार करता येतात. स्क्रीनिंग आणि नियमित आरोग्य तपासण्यांमुळे गंभीर लक्षणं टाळता येतात आणि आजाराचं लवकर निदान शक्य होतं.
तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे कॅन्सर उपचारात मोठे बदल झालेत. उपचारांची मर्यादा आता केवळ शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि रेडिएशनपुरती राहिलेली नाही. मिनिमली इन्वेसिव्ह सर्जरी, इम्युनोथेरपी, टार्गेटेड थेरपी आणि प्रिसिजन मेडिसिन यांसारख्या आधुनिक पद्धतींमुळे रुग्णांचं जीवनमान सुधारतं आणि दुष्परिणाम कमी होतात.
कॅन्सरशी संबंधित अनेक जोखीमीचे घटक असे आहेत ज्यामध्ये आपण बदल करू शकतो. तंबाखू आणि मद्यपान, असंतुलित आहार, लठ्ठपणा आणि काही संसर्ग हे कॅन्सरचा धोका वाढवतात. तंबाखू व मद्यपान टाळणं, संतुलित आहार घेणं, नियमित व्यायाम करणं आणि HPV आणि हिपॅटायटिस-बी सारख्या लस घेणं यामुळे कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो.
कॅन्सरचे निदान होण्याच्या भीतीमुळे अनेकजण डॉक्टरांकडे जाण्यास विलंब करतात. कॅन्सरकडे वैद्यकीय समस्या म्हणून पाहणं गरजेचं आहे. ज्यावर योग्य वेळी उपाय करता येतो. जितक्या लवकर उपचार सुरू होतात तितके परिणाम चांगले मिळतात. कुटुंबीय आणि मित्रांचा पाठिंबा देखील रुग्णाच्या बरं होण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.