अनेक भारतीयांमध्ये खाद्यपदार्थांच्या सवयींमध्ये मोठा बदल होऊ लागला आहे. ठिकठिकाणी फोफावत असलेली फास्ट फूडची दुकाने हे केवळ बदलत्या ग्राहक संस्कृतीचे लक्षण मानले जात नसून, देशाच्या आरोग्यविषयक समस्या वाढवण्यासही कारणीभूत ठरत आहे. वाढत्या फास्टफूडमुळे स्थूलतेचा वाढता आजार ही आरोग्यासाठी चिंताजनक बाब ठरली आहे. चारपैकी किमान एक प्रौढ भारतीयाला स्थूलनेने ग्रासल्याचे सध्याच्या आकडेवारीतून दिसते. ‘द लान्सेट’ या प्रतिष्ठित मासिकाच्या २०२३च्या अभ्यासानुसार, २५ टक्के प्रौढ भारतीयांना स्थूलतेविषयी सामान्य पातळीवरील आजार झाला आहे. ३३ टक्के भारतीयांचे वजन नियंत्रणात न राहिल्याने पोटाची घेरी वाढली आहे.
स्थूलतेमुळे विविध आजारांना निमंत्रण मिळते. या आजाराचे निदान आरोग्यासाठी घातक ठरु शकते. मधुमेहामुळे प्रामुख्याने डोळ्यांच्या कार्यपद्धतीवर बिघाड होतो. शरीराच्या विविध अवयवांवर दुष्परिणाम होतो. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, भारतात सध्या १० कोटी १० लाख मधुमेहग्रस्त रुग्ण आहेत. सुमारे ४० लाख रुग्णांना कायमस्वरुपी अंधत्व येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जाणून घेऊयात स्थूलता, मधुमेह, स्क्रीनचा अतिरिक्त वापर याबद्दल सविस्तर डॉ.अरुण संघवी, व्यवस्थापकीय संचालक - मुख्य कार्यकारी अधिकारी, एसीजी आय हॉस्पिटल यांच्या कडून.
भारतातील ८५ टक्के मधुमेहग्रस्त रुग्ण हे डोळ्यांच्या गंभीर दुष्परिणांबाबात अनभिज्ञ आहेत. जागरुकतेच्या अभावामुळे अनेक मधुमेहग्रस्त डोळ्यांची तपासणीही करत नाही. रुग्णाला मधुमेहासह स्थूलतेचा आजार जडल्यास डायबेटिक रेटिनोपॅथी (मधुमेहामुळे डोळ्यांना होणारा आजार)चा धोका जास्त प्रमाणात संभवतो. डायबेटिक रेटिनोपॅथीमुळे रुग्णाला अंधत्व येण्याची भीती असते. या समस्येची तीव्रता लक्षात घेता देशात डायबॅटिक रेटिनोपॅथीच्या रुग्णांची संख्या वाढेल. ही रुग्णसंख्या शेजारच्या श्रीलंका देशातीलडायबेटिक रेटिनोपॅथीच्या रुग्णांपेक्षा जास्त असेल, असा इशारा काही अहवालांतून व्यक्त करण्यात आला आहे.
येत्या २०२४ पर्यंत भारतातील मधुमेहग्रस्त रुग्णांची संख्या १२ कोटी ५० लाखांपर्यंत पोहोचेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. यापैकी २ कोटी १० लाखांपेक्षा जास्त रुग्णांना डायबेटिक रेटिनोपॅथीचा आजार जडण्याची दाट शक्यता आहे. मधुमेहावर वेळीच नियंत्रण मिळाले नाही तर ५० ते ६० लाख लोकांना कायमस्वरुपी अंधत्व येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
मधुमेहामुळे डोळ्यांना गंभीर दुखापत होत असल्याने आता केंद्र सरकारने नुकतीच सुधारित डायबेटिक रेटिनोपॅथीच्या व्यवस्थापनाविषयीची राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. डायबेटिक रेटिनोपॅथीबाबत जनजागृती करणे, तपासणीचा दर ८० टक्क्यांपर्यंत नेणे, उपचार घेणा-या रुग्णांचा नियमित पाठपुरावा करणे, यात किमान ५० टक्के रुग्णांच्या आरोग्याविषयी नियमित माहिती घेणे हे या सुधारित मार्गदर्शक तत्वांचे उद्दिष्ट आहे. याबद्दल माहिती घेण्यासाठी सुमारे ८३ हजार भारतीयांवर राष्ट्रीय सर्व्हेक्षण करण्यात आले. यापैकी केवळ १० टक्के लोकच डायबेटिक रेटिनोपॅथीची तपासणी करुन घेत असल्याची बाब निराशाजनक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) दक्षिण-पूर्व आशिया प्रादेशिक कार्यालयाने २०३० पर्यंत ८० टक्के डायबेटिक रेटिनोपॅथीचे उद्दिष्ट बाळगले आहे. त्या तुलनेत भारताचे सद्यस्थितीतील तपासणी प्रमाण फारच कमी आहे.
सरकारी उपक्रमांसह नागरिकांमध्येही या आजारांविषयी व्यापक जनजागृती करणे गरजेचे आहे. डोळ्यांचे आरोग्य हा स्वतंत्र आरोग्याचा विषय असल्याचे मानणे सर्वांसाठी घातक आहेत. डोळ्यांचे आरोग्य हे एकूणच सर्व शारिरीक आरोग्याशी संबंधित महत्त्वाचा घटक असल्याची सर्वांना जाणीव असायला हवी. डोळ्यांचा आजार ओळखण्याची नियमित तपासणीला प्रोत्साहन द्यायला हवे. जेणेकरुन लवकर निदान होऊन योग्यवेळी उपचार सुरु करता येतील. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशाली हे निरोगी आरोग्यासाठी आवश्यक आहेत. सामान्यतः लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये आढळणारा टाईप-१ आणि जीवनशैलीतील बदलांमुळे प्रामुख्याने दिसणारा टाईप-२ मधुमेह ही या आरोग्याच्या समस्यांची प्रमुख कारणे मानली जातात.
मधुमेहग्रस्त रुग्णाला दीर्घकाळ या गंभीर आजाराचा सामना करावा लागल्यास डायबेटिक रेटिनोपॅथीचे निदान होते. रक्तातील साखरेचे प्रमाण दीर्घकाळी उच्च स्तरावर राहिल्याने डोळ्यांच्या पडद्यामधील रक्तवाहिन्यांचे गंभीर नुकसान होते. रक्तवाहिन्या क्षीण होऊ लागतात. डायबेटिक रेटिनोपॅथीच्या रुग्णाच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित न राहिल्यास हा आजार गंभीर होतो. उपाशी रुग्णाच्या रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त होत गेले किंवा वारंवार अनियंत्रित राहिल्यास डायबेटिक रेटिनोपॅथी गंभीर स्वरुप धारण करतो.
उच्च रक्तदाबामुळेही रुग्णाला डायबेटिक रेटिनोपॅथीसारखा गंभीर आजार जडतो. उच्च रक्तदाबामुळे संपूर्ण शरीरातील रक्तवाहिन्यांवर ताण येतो. यामध्ये डोळ्यांच्या पडद्यातील नाजूक रक्तवाहिन्यांनाही त्रास होतो. रक्तवाहिन्यांच्या कार्यपद्धतीत बिघाड होतो. रक्तातील कोलेस्ट्रोल, ट्रायग्लिसराइड्स तसेच इतर चरबीचे प्रमाण जास्त प्रमाण असल्यास डायबेटिक रेटिनोपॅथीचा धोका वाढतो. हे सर्व घटक रक्तवाहिन्यांचे नुकसान करतात. शरीरातील दाह वाढवतात.
मधुमेहाच्या व्यवस्थापनासाठी लोकांमध्ये सकारात्मक जीवनशैली रुजवायला हवी. यामध्ये संतुलित आणि पौष्टिक आहार, नियमित व्यायाम आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इन्सुलिन किंवा तोंडी औषधांचे सेवन करणे आदी सवयींचा समावेश होतो. मधुमेहग्रस्त रुग्णांना साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवायला हवे.
ग्लायसेमिक नियंत्रणामुळे डायबेटिक रेटिनोपॅथीचा प्रसार मंदावतो. डोळ्यांतील रक्तवाहिन्याचे नुकसान टाळता येते. परिणामी अंधत्वाचा धोका टाळता येतो.डायबेटिक रेटिनोपॅथीविषयी नेमकी वस्तुस्थिती जाणून घ्यायला हवी. वेळोवेळी डोळ्यांची तपासणी करणे हे मधुमेहग्रस्तांसाठी आपले डोळे जपण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. योग्य वेळी उपलब्ध होणारे निदान तसेच उपचार भविष्यातील गंभीर समस्यांना वेळीच आटोक्यात आणतात. मधुमेह व्यवस्थापनात जागरुक राहणे, निरोगी जीवनशैली स्वीकारणे याद्वारे रुग्ण आपली दृष्टी गमावण्याचा धोका लक्षणीयरित्या कमी करु शकतात. याकरिताच, डोळे वाचवण्यासाठी प्रत्येक पावलावर जागरुकता आणि तपासणी महत्त्वाची आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.