आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन
ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली
मनोरंजन क्षेत्रात शोककळा
दिग्गज कलाकारांकडून श्रद्धांजली
Asha Bhosle Death In Mumbai Hospital News भारतीय संगीतविश्वातून एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वात शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निधनानंतर मराठी सृष्टीतील दिग्गज कलाकारांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची काल प्रकृती खालावली होती. त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती त्यांची नातं जानाई भोसले हिने दिली होती. आज आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी माध्यमांसमोर येऊन अश्रू भरलेल्या नयनांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली. आशा ताईंच्या निधनाने मनोरंजन विश्वासह राजकीय क्षेत्रांतून देखील हळहळ व्यक्त केली जात आहे.
तीन वर्षांपूर्वी धडाक्यात नव्वदी साजरी करणार्या ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने मंगेशकर घराण्यातील लतादिदींनंतर आणखी एक तारा निखळला आहे. सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली, अशी शोकभावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
गायक संगीतकार सलील कुलकर्णी यांनी आशा ताईंच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे.सलील कुलकर्णी म्हणाले की, आशा ताई या जगात आता नाहीत यावर विश्वासच बसत नाही. ही कल्पना करणं देखील अशक्य आहे, कारण आकाशातील चांदणं गेलं की आकाश कसं दिसेल? लता ताईंनंतर आशा ताईंचा संगीतविश्वाला आधार होता. संगीत विषयी बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर वेगळी चमक असायची. त्यांना जेव्हा जेव्हा भेटलो तेव्हा त्यांची संगीताप्रती असलेलं इमानदारी जाणवायची.
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी आशा ताई यांच्या निधनानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आशा ताईचं निधन होणं हे न पटण्यासारखी गोष्ट आहे. एक असा आवाज जो प्रत्येक घरात घुमत होता. त्यांची प्रत्येक गाणी मंत्रमुग्ध करणारी होती. मराठी, हिंदी सृष्टीत असा आवाज होणे नाही असा शोक अशोक सराफ यांनी व्यक्त केला आहे.
एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून, सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड गेली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे की, आशा भोसले यांच्या आवाजात विलक्षण माधुर्य, विविधता आणि भावनांची अप्रतिम अभिव्यक्ती होती. हिंदी, मराठीसह विविध भारतीय भाषांमधील हजारो गाण्यांमधून त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ‘पिया तू अब तो आजा’, ‘दम मारो दम’, ‘इन आंखों की मस्ती’, ‘चुरा लिया है तुमने’ यांसारखी असंख्य गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. त्यांच्या गायकीत आधुनिकतेसोबतच पारंपरिकतेचा सुंदर संगम दिसून येतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.