Amitabh Bachchan: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या ताज्या ब्लॉग पोस्टने त्यांच्या लाखो चाहत्यांची चिंता वाढवली आहे. या ब्लॉगमध्ये त्यांनी रुग्णालयातील शस्त्रक्रिया, आयसीयू (ICU) मधील उपचार आणि त्यानंतरच्या शारीरिक व मानसिक संघर्षाबद्दल अत्यंत भावनिक शब्दांत अनुभव मांडले आहेत. त्यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर चाहते त्यांच्या प्रकृतीबाबत काळजी व्यक्त करत लवकर बरे होण्याची प्रार्थना करत आहेत.
अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमध्ये लिहिले की, रुग्णालयातील शस्त्रक्रियेनंतर आयसीयूमध्ये डॉक्टर आणि त्यांच्या टिमने अत्यंत उत्तम काळजी घेतली. मात्र, रुग्णालयातून घरी परतल्यानंतरचा काळ सर्वाधिक कठीण होता. त्यांच्या मते, या काळात शारीरिक वेदनांसोबत मानसिक आणि भावनिक संघर्षाचाही सामना करावा लागतो.
ते पुढे म्हणाले की, आयुष्यात अनेकदा आपण विजयी असल्याची भावना बाळगतो, पण अचानक आलेला पराभव किंवा आरोग्याशी संबंधित संकट आपल्याला वास्तवाची जाणीव करून देते. हा टप्पा प्रत्येकासाठी कठीण असतो. मात्र, या परिस्थितीत धैर्य न सोडता पुढे जाणे महत्त्वाचे आहे.
ब्लॉगमध्ये त्यांनी सकारात्मक विचार मांडत लिहिले की, काही लोक संकटांशी लढण्याचा मार्ग निवडतात, तर काही जण परिस्थितीशी तडजोड करतात. जो व्यक्ती धैर्याने प्रयत्न करत राहतो, तोच खरा विजेता ठरतो. शेवटी त्यांनी सर्वांना "निरोगी राहा, आनंदी राहा" असा संदेश दिला.
याचदरम्यान अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक ट्विटही केले. "T 5806 – खेळ संपला आहे! पण काम अजूनही सुरू आहे," असे त्यांनी लिहिले. या पोस्टचा नेमका अर्थ स्पष्ट नसला तरी त्यानंतर चाहत्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आले. अनेकांनी कमेंट करत त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना व्यक्त केली. "लवकर बरे व्हा अमित जी", "आपल्या प्रकृतीची काळजी घ्या", "आपण कायम निरोगी राहा", अशा अनेक कमेंट चाहत्यांनी सोशल मीडियावर केल्या आहेत. यापूर्वीही अमिताभ बच्चन यांनी आरोग्यावर अनेकदा मत व्यक्त केलं आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, नंतर ती केवळ रुटीन टेस्ट असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.
दरम्यान, वयाच्या ८० वर्षांनंतरही अमिताभ बच्चन कामात तितकेच सक्रिय आहेत. सध्या ते 'कल्की 2898 AD' या चित्रपटाच्या सिक्वेलच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून, चित्रपट, टेलिव्हिजन आणि सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी सातत्याने संवाद साधत आहेत. त्यांच्या या नव्या ब्लॉगमुळे चाहत्यांमध्ये चिंता वाढली असली, तरी त्यांनी दिलेला धैर्य आणि सकारात्मकतेचा संदेश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.