बीड मधून गेवराई तालुक्यातील गौंडगाव शिवारात जमिनीच्या किरकोळ वादातून एका ५७ वर्षीय शेतकऱ्याची काठ्या आणि दगडाने मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अर्जुन साहेबराव माळी असं मृत शेतकऱ्याचं नाव असून, या प्रकरणी गेवराई पोलिसांनी एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), ३(५) आणि ३५२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
ही थरारक घटना शनिवारी ११ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. या घटनेमुळे रामनगर तांडा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत अर्जुन माळी यांनी गौंडगाव शिवारातील शेत गट क्रमांक १५५ मधील गायरान जमिनीचा काही हिस्सा मशागतीसाठी ताब्यात घेतला होता. या जमिनीच्या उत्तर दिशेला आरोपी मधुकर नायबा शिंदे यांची मालकीची शेतजमीन आहे. घटनेच्या दिवशी सायंकाळी पाचच्या सुमारास अर्जुन माळी हे आपल्या शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले होते.
त्याच वेळी आरोपी मनोहर शिंदे याने मृताचा मुलगा पपेश याला "तुझा बाप जास्त मस्तीला आला आहे, त्याला जाऊन बघतो" अशी उघड धमकी दिली होती. संशय आल्याने पपेश आणि त्याचा मित्र गणेश महाजन यांनी तातडीने शेताकडे धाव घेतली.
घटनेच्या ठिकाणी आरोपी मधुकर नायबा शिंदे, त्याचा मुलगा मनोहर मधुकर शिंदे आणि नातू अजय मनोहर शिंदे यांनी अर्जुन माळी यांना घेरलं. शेताचा बांध का फोडला या कारणावरून वाद घालत आरोपींनी माळी यांना काठ्या आणि दगडांनी अमानुष मारहाण केली.
या मारहाणीत गंभीर जखमी अवस्थेत अर्जुन माळी यांना प्रथम गेवराईच्या सरकारी दवाखान्यात आणि त्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने बीडच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या प्रकरणी पपेश माळी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब पवार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.