eldest son rights on father’s property : घरातील वडिलांची मालमत्ता किंवा संपत्ती कोणाला मिळणार, यावरून अनेकदा कुटुंबांमध्ये वाद निर्माण होतात. वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबातील 'मोठ्या मुलाला' संपत्तीवर पहिला आणि पूर्ण अधिकार असतो, असा आपल्या समाजात एक समज आहे. पण खरंच थोरल्या मुलाला भारतीय कायद्यात हा अधिकार मिळतो का? याचे उत्तर 'नाही' असे आहे.
मालमत्तेची विभागणी फक्त थोरला मुलगा कोण आहे? यावर अवलंबून नसते, तर अनेक कायदेशीर नियमांवर अवलंबून असते. पण भारतीय कायदा आणि हिंदू वारसा हक्क कायदा (Hindu Succession Act) याबाबत काय सांगतो? खरंच मोठ्या मुलाला विशेषाधिकार आहेत की सर्व मुला-मुलींना समान हक्क मिळतात? याबाबत जाणून घेऊयात..
कायदेतज्ज्ञांनी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांनी याची परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट केली आहे. वडिलांची संपत्ती ही 'स्वअर्जित' (स्वतः कमावलेली) आहे की 'वडिलोपार्जित' (आजोबा-पणजोबांची), यावर मुलांचे हक्क अवलंबून असतात. जर संपत्ती स्वअर्जित असेल, तर वडील आपल्या हयातीत किंवा मृत्युपत्राद्वारे (Will) कोणालाही ती संपत्ती देऊ शकतात. तिथे मोठ्या मुलाचा असा कोणताही थेट अधिकार नसतो. तर वडिलोपार्जित संपत्तीत सर्व मुला-मुलींना जन्मानेच समान अधिकार मिळतो. त्यामुळे मोठा मुलगा म्हणून कोणालाही विशेष हक्क मिळत नाही, ही कायद्याची मुख्य बाजू आहे.
घरातील मोठा मुलगा हा घराचा वारस असतो का?
वडिलांच्या मालमत्तेचा मुख्य वारस हा थोरला मुलगा असतो, भारतीय कुटुंबांमध्ये अशी एक जुनी समजूत आहे. पण थोरल्या मुलाला संपूर्ण मालमत्ता वारसा हक्काने मिळवण्याची परवानगी देणारी कोणतीही कायदेशीर तरतूद नाही. या गैरसमजामुळे अनेकदा कौटुंबिक वाद आणि कायदेशीर कारवाईसुद्धा होते.
कुटुंबाचे हक्क कोणते आहेत?
खरं तर, एखाद्या व्यक्तीच्या मालमत्तेचा वारसा कोणाला मिळेल हे अनेक घटकांवर अवलंबून आहे. सर्वात आधी महत्त्वाचे म्हणजे, ती मालमत्ता वडिलोपार्जित आहे की वैयक्तिक उत्पन्नातून मिळवलेली आहे, याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. त्याशिवया मृत व्यक्तीने मृत्युपत्र केले होते की नाही? याचाही विचार करणे महत्त्वाचे आहे. इतकेच नव्हे तर त्या व्यक्तीला लागू होणारे वारसा हक्काचे कायदे देखील महत्त्वाचे आहेत.
मुलींनाही समान हक्क मिळतात
हिंदू उत्तराधिकार कायदा, १९५६ आणि त्याच्या २००५ च्या सुधारणेनुसार, मुलींना वडिलोपार्जित मालमत्तेवर मुलांप्रमाणेच समान हक्क आहेत. म्हणजेच काय तर वडिलांच्या संपत्तीवर फक्त मुलगाच नव्हे तर मुलीचाही समान कायदेशीर वाटा आहे.
कायदेशीर वारसांना समान हक्क मिळतात
जर एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या कमाईतून मालमत्ता खरेदी केली असेल आणि वैध मृत्युपत्र बनवले असेल, तर ती व्यक्ती आपल्या इच्छेनुसार कोणालाही ती मालमत्ता देऊ शकते. पण जर मृत्युपत्र नसेल तर कायद्यानुसार मालमत्तेची सर्व कायदेशीर वारसांमध्ये विभागणी केली जाते. अशा परिस्थितीत मोठ्या मुलाला कोणतेही अतिरिक्त किंवा विशेष अधिकार मिळत नाहीत.
मालमत्तेचा हक्क नाही का?
भारतात मालमत्तेचा हक्क हा एक मूलभूत हक्क आहे, असा समज अनेक लोकांचा आहे. पण तसे नाही. १९७८ मध्ये झालेल्या ४४ व्या घटनादुरुस्तीनंतर मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्क राहिला नाही. तो घटनेच्या कलम ३०० अ अंतर्गत एक कायदेशीर हक्क म्हणून कायम आहे. म्हणजेच कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय कोणत्याही व्यक्तीला तिच्या मालमत्तेपासून वंचित केले जाऊ शकत नाही.