पूर्वी सिम कार्ड हरवले की आपल्याला सहज दुसरे सिम कार्ड मिळत होते. पण आता या प्रोसेसमध्ये नवे महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. डिजिटल पद्धतीच्या आधारे सिम कनेक्शिनसाठी आता बायोमेट्रिक पडताळणी आवश्यक केली जाणार आहे. दूरसंचार विभागाने जारी केलेल्या या नव्या नियमामुळे गुन्हेगारीला आळा बसणार आहे.
यापूर्वी सिम कार्ड खरेदी करताना केवायसी ही महत्त्वाची प्रक्रिया मानली जायची. यामुळे एक ग्राहकाच्या आधारावर कितीही सिम कार्ड घेणे सहज शक्य होते. पण जाहीर केलेल्या नव्या नियमानुसार केवळ केवायसी पुरेशी ठरणार नाही. वापरकर्त्यांची ओळख बायोमेट्रिक पद्धतीने तपासली जाणार आहे. यामध्ये बोटांचे ठसे, चेहऱ्याचे स्कॅनिंग तसेच डोळ्यांच्या बाहुलीचे देखील स्कॅनिंग केले जाणार आहे.याशिवाय सिम कार्ड खरेदी करतान दिलेली माहिती अपडेट करण्यासाठी , सिम कार्ड ब्लॉक करण्यासाठी बायोमेट्रिक पडताळणी आवश्यक असणार आहे. असे दूरसंचार विभागाने स्पष्ट केले आहे.
मोबाईल फक्त कॉलिंग पुरता मर्यादित न राहता याचा वापर बँकिंगपासून यूपीआय आणि अनेक डिजीटल सेवांसाठी केला जातो. या सेवांचा लाभ घेत असताना मोबाईल आणि सिम ची योग्य माहिती असणे महत्त्वाचे आहे. या प्रोसेसमुळे मोबाईलवरून संबंधित माणसाची अचूक माहिती मिळवणे आणि सिम कार्ड संबंधित गैरप्रकार टाळण्यासाठी हे नवे नियम हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
दूरसंचार विभागाने जारी केलेल्या या नव्या नियमानुसार 9 पेक्षा जास्त सिम कार्ड वापरता येणार नाही. याशिवाय ज्या ग्राहकांकडे जास्त सिम कार्ड असतील त्यांची माहिती ठेवणे कंपनीला बंधनकारक असणार आहे. मर्यादेपेक्षा जास्त सिम कार्ड ग्राहकाकडे आढळल्यास सिम कार्ड ब्लॉक करण्यात येणार आहेत. ग्राहकांची सुरक्षा लक्षात घेऊन हे नियम लागू केल्याचे दूरसंचार विभागाने स्पष्ट केले आहे.