

महाराष्ट्र सरकारची महिलांसाठी योजना
बचत गटांना मिळते कमी व्याजदरात कर्ज
या वर्षासाठी ३०० कोटींचे कर्जवाटप
राज्य सरकारने महिलांसाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. यातील अनेक योजनांमध्ये महिलांना स्वतः च्या पायावर उभं राहण्यासाठी मदत केली जाते. बचत गटाला स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी लोन दिले जाते. सोलापूर जिल्ह्यातील बचत गटांना या आर्थिक वर्षात तब्बल ३०० कोटींचे कर्जवाटप होणार आहे.
केंद्र सरकार आणि राज्य शासनाकडून पुढच्या महिन्यापर्यंत हे कर्ज दिले जाण्याचे उद्दिष्ट आहे. सोलापूरातील तब्बल २४ हजार २०० बचत गटांना हे कर्ज दिले जाणार आहे. यामध्ये अडीच लाख महिला आहेत. यामुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरु करुन तो यशस्वी करुन दाखवण्याची इच्छा निर्माण होते. यामुळे रोजगाराची संधीदेखील निर्माण होते.
उमेद (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) या माध्यमातून बचत गटांना कर्ज मिळते. यामुळे सोलापूरातील १ लाख कुटुंबाला आधार मिळणार आहे. बचत गट उमेदच्या मदतीने बँकांकडून कर्ज घेतात. यातून व्यवसाय सुरु करतात आणि कर्जाची परतफेडदेखील करतात.
जवळपास ३० हजारांपेक्षा जास्त महिलांनी स्वतःचे व्यवसाय सुरु केले आहेत.याअंतर्गत सुरुवातीला ३० हजार ते १ लाख रुपयांचे कर्ज मिळायचे. आता ३ ते १० लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. बचत गट हे कर्ज वाटून घेतात आणि व्यवसाय सुरु करतात. या कर्जाची परतफेडदेखील केली जाते. जर कर्जाची नियमित परतफेड केली तर बँकांकडून व्याजदरात सवलत मिळते.