भारतीय क्रिकेट टीममध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आता अधिकच वाढली आहे. इंग्लंड दौऱ्यात सुरू असलेल्या वनडे सिरीजदरम्यान रोहित शर्माच्या भवितव्याबाबत मोठी चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी लॉर्ड्सवर होणारा तिसरा वनडे सामना हा रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरू शकतो.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय निवड समिती आता पुढील काही वर्षांचा विचार करून टीम तयार करतेय. 2027 च्या वनडे वर्ल्डकप लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून युवा खेळाडूंना अधिक संधी देण्याची रणनीती आखली जातेय.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचे आई-वडील, गुरुनाथ शर्मा आणि पूर्णिमा शर्मा, भारत-इंग्लंड यांच्यात १९ जुलै रोजी लॉर्ड्सवर होणाऱ्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यापूर्वी लंडनमध्ये दाखल झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, हा सामना रोहित शर्माच्या वनडे कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
PTI च्या वृत्तानुसार, मुख्य सिलेक्टर्स अजित आगरकर सध्या इंग्लंड दौऱ्यावर भारतीय टीमसोबत आहेत. इंग्लंडविरुद्धची सिरीज संपल्यानंतर रोहित शर्माची वनडे टीममध्ये निवड करण्याच्या बाजूने ते नसल्याची चर्चा आहे. निवड समितीचं मत असे आहे की, आता नव्या पिढीतील खेळाडूंना तयार करण्याची वेळ आली असून भविष्यासाठी टीम तयार सुरू करणं गरजेचं आहे.
रोहित शर्माची अलीकडची वनडेतील कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. मागील आठ वनडे सामन्यांमध्ये त्याने 30.1 च्या सरासरीने आणि 88.6 च्या स्ट्राइक रेटने 241 रन्स केलेत. या आठ सामन्यांमध्ये त्याच्या नावावर केवळ एकच अर्धशतक आहे.
बीसीसीआयशी संबंधित एका वरिष्ठ सूत्राने PTIला सांगितलं की, युवा ओपनर यशस्वी जायसवालला सातत्याने वनडेमध्ये खेळवण्याचा विचार सुरू आहे. इंग्लंड दौऱ्यात त्याने तीन डावांत दोन शतकं झळकावली असून त्याला पुढील सुमारे 20 वनडे सामने संधी देण्याचा विचार आहे. त्यामुळे 2027 च्या वर्ल्डकपसाठी त्याची योग्य तयारी होऊ शकेल, असा निवड समितीचा विचार आहे.
याच सूत्राने असंही सांगितलंय की, रोहित शर्मा टीममध्ये राहिला तर जायसवालला संधी मिळणं कठीण होऊ शकतं. त्यामुळे भविष्यातील टीम लक्षात घेऊन निवड समिती बदल करण्याच्या तयारीत आहे.
या अहवालात आणखी एक महत्त्वाची बाब सांगण्यात आली आहे. निवड समिती कोणत्याही खेळाडूला निवृत्ती घेण्यास भाग पाडू शकत नाही. त्यामुळे रोहित शर्माच्या भवितव्याचा अंतिम निर्णय त्यालाच घ्यावा लागणार आहे. मात्र सप्टेंबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या घरच्या वनडे सिरीजपूर्वी निवड समिती नव्या दिशेने पावलं उचलण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.
रोहितबाबत बदलाचा विचार सुरू असला तरी विराट कोहलीच्या बाबतीत चित्र वेगळं असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. मुख्य प्रशिक्षक आणि मुख्य सिलेक्टर अजित आगरकर यांचं मत असं आहे की, विराटची सध्याची कामगिरी आणि फिटनेस पाहता तो अजूनही भारतीय वनडे टीममध्ये पहिली पसंती आहे. त्यामुळे त्याच्या स्थानाबाबत सध्या कोणताही प्रश्न उपस्थित होत नसल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलंय.