Ajinkya Rahene : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाइट रायडर्स संघाला मुंबई इंडियन्सकडून दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे यानं कारण सांगितलं आहे. आठ विकेटनं झालेल्या पराभवाचं खापर त्यानं फलंदाजांवर फोडलं आहे.
आम्ही सर्व जण अपयशी ठरलो आहोत. सगळेच फलंदाज अपयशी ठरले आहेत. खरं तर फलंदाजीसाठी खेळपट्टी अनुकूल होती. या खेळपट्टीवर १८० किंवा १९० धावा व्हायला हव्या होत्या. खेळपट्टीवर चेंडूला उसळी मिळत असेल तर, त्याचा फायदा उठवायला हवा. आम्हाला अधिक शिकण्याची गरज आहे, असं अजिंक्य रहाणे म्हणाला.
कोलकाताचा कर्णधार अजिंक्य रहाणे यानं गोलंदाजांचं कौतुक केलं. गोलंदाजांनी खूप प्रयत्न केले. पण स्कोअरबोर्डवर धावा जास्त नव्हत्या. कारण आमचे फलंदाज एकापाठोपाठ एक बाद होत गेले, असे रहाणे म्हणाला. पॉवर प्लेमध्ये चार विकेट गमावल्यानंतर कमबॅक करणे कठीण असते, अशी कबुलीही त्यानं दिली.
कोलकाताला नांगी टाकायला लावणारा अश्वनी कुमार
तत्पूर्वी, पदार्पणाच्या सामन्यातच चार विकेट घेणारा मुंबई इंडियन्सचा गोलंदाज अश्वनी कुमार यानं कोलकाताच्या फलंदाजांना नांगी टाकायला लावली. त्याच्या आणि रियान रिकेलटन (४१ चेंडूंत नाबाद ६२ धावा ) याच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं कोलकाताला पराभूत केलं. कोलकाताला आठ गडी राखून नमवलं आणि पॉइंट्स टेबलमध्ये जबरदस्त उसळी घेतली.
कोलकाताचा खेळ खल्लास
पंजाबच्या २३ वर्षीय अश्वनी कुमार यानं आयपीएलमध्ये पदार्पण केलं. कोलकाताविरुद्ध गोलंदाजी करताना त्यानं अवघ्या २४ धावा देत ४ विकेट घेतल्या. वानखेडे मैदानात कोलकाताला मुंबई इंडियन्सनं ११६ धावांवरच रोखलं. या आयपीएलच्या हंगामातली आतापर्यंतची निचांकी धावसंख्या आहे. अश्वनी आयपीएलमध्ये पदार्पणाच्या सामन्यात चार विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.
माफक आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सच्या रिकेलटन यानं ४१ चेंडूंत नाबाद ६२ धावा तडकावल्या. त्यात चार चौकार आणि पाच षटकारांचा समावेश आहे. मुंबई इंडियन्सनं दोन विकेट गमावून १२.५ षटकांतच १२१ धावा करून विजय मिळवला. या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सनं पहिला विजय मिळवला आहे. याआधीच्या दोन सामन्यांत मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला होता.
रोहित शर्मा पुन्हा अपयशी
मुंबई इंडियन्सकडून सूर्यकुमार यादव याने तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २७ धावा कुटल्या. रोहित शर्मा पुन्हा अपयशी ठरला. त्याला अवघ्या १३ धावा करता आल्या. विल जॅक्स हा १६ धावा करून बाद झाला. त्याला आंद्रे रसेलने तंबूत धाडले. या विजयामुळं तळाला असलेला मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत थेट सहाव्या क्रमांकावर पोहोचला. तत्पूर्वी अश्वनी कुमारनं अजिंक्य रहाणे (११ धावा), रिंकू सिंह (१७ धावा), मनीष पांडे (१७ धावा) आणि आंद्रे रसेल (५ धावा) यांना बाद करून अर्धी लढाई जिंकली होती. तर ट्रेंट बोल्ट याने एक विकेट घेतली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.