अवघ्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीनं अख्ख्या क्रिकेट जगताचं लक्ष वेधून घेतलं आहे. क्वालिफायर २ मध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ भिडणार असले तरी, लक्ष केवळ वैभव सूर्यवंशीकडे लागले आहे. सचिन तेंडुलकरपासून विदेशी खेळाडूंनीही वैभवचं कौतुक केलं आहे. आता दिग्गज क्रिकेटपटू आणि भारताचा माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यानंही वैभव सूर्यवंशीचं कौतुक केलं आहे. याशिवाय क्वालिफायरमध्ये राजस्थान की गुजरातचा संघ जिंकणार, वैभव सूर्यवंशी खेळणार की नाही? याबाबतही कुंबळेने भविष्यवाणी केली आहे.
जिओ हॉटस्टारवरील गेम प्लानमधील चर्चेत अनिल कुंबळे यानं वैभव सूर्यवंशीचा आक्रमक खेळ आणि सातत्य याचं भरभरून कौतुक केलं आहे. फक्त षटकार मारण्याची क्षमताच नाही तर, कामगिरीत सातत्य असणे ही वैभवची सर्वात जमेची बाजू आहे, असे सांगतानाच, दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्सचं पारडं जड असल्याचंही त्यानं सांगितलं. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ज्या प्रकारे आक्रमक फलंदाजी केली, तशीच फलंदाजी तो गुजरात टायटन्सविरुद्ध करेल, असा विश्वासही व्यक्त केला.
क्वालिफायर २ मध्ये गुजरात जिंकणार की राजस्थान, असा प्रश्न प्रत्येक चाहत्याला पडला आहे. याबाबत कुंबळे म्हणाला की, भविष्यवाणी करणं थोडं कठीण आहे. पण राजस्थानने खूपच चांगला खेळ केला आहे. मला अजूनही असा विश्वास वाटतोय की सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ज्या आक्रमक पद्धतीने वैभव सूर्यवंशीने फलंदाजी केली तशीच फलंदाजी तो गुजरात टायटन्सविरुद्ध करेल. वैभवने अशी फलंदाजी केली तर त्याचा फायदा राजस्थानला नक्कीच होईल.
वैभव सूर्यवंशी सध्या आयपीएलचे जवळपास सर्वच रेकॉर्ड मोडण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्याचा आक्रमक खेळ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात त्याने ६५ षटकार ठोकून इतिहास रचला आहे. वेस्ट इंडीजचा दिग्गज खेळाडू ख्रिस गेल याचा २०१२ मधील ५९ षटकारांचा विक्रम त्यानं मोडीत काढला आहे. राजस्थान रॉयल्सच्या या युवा खेळाडूनं १५ डावांमध्ये आतापर्यंत ६८० धावा केल्या आहेत. आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये म्हणजेच ऑरेंज कॅप रेसमध्ये तो अग्रस्थानी आहे. याशिवाय एका टी २० स्पर्धेत किशोरवयीन खेळांडूंमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रमही त्यानं नावावर केला आहे.
वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीचं कौतुक करताना अनिल कुंबळे यानं त्याचा सलामीवीर साथीदार यशस्वी जयस्वाल याचाही उल्लेख केला आहे. या मोसमात सूर्यवंशीच्या आक्रमक खेळीमुळं यशस्वी जयस्वालवरही काही प्रमाणात दबाव वाढला आहे. जयस्वाल यानं याच मोसमात १५ सामन्यांत ४२६ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ३२.७७ आणि स्ट्राइक रेट १५३ हून अधिक आहे.
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध या दोन्ही सलामीवीरांनी केलेली भागीदारी जबरदस्त होती. आठ षटकांत त्या दोघांनी १२० धावा केल्या होत्या. पण त्यातील अधिक धावा तर एकट्या वैभव सूर्यवंशीने केल्या होत्या. फलंदाजीसाठी पोषक असलेल्या खेळपट्टीवर वेगाने धावा करण्यास असमर्थ ठरल्यामुळं यशस्वी जयस्वाल हा निराश असेल, असेही कुंबळे म्हणाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.