अवघ्या काही तासात आशिया कपमधील भारत आणि पाकिस्तानच्या हायव्होल्टेज सामन्याला सुरुवात होईल. भारतीय वेळेनुसार ८ वाजता या सामन्याला सुरुवात होईल. ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतील. राजकीय पक्ष, माजी क्रिकेटसह सोशल मीडियावर या सामन्याचा तीव्र निषेध केला जात आहे.
एकीकडे सामन्यावर बहिष्कार घालण्याची मागणी केली जात आहे तर दुसरीकडे दोन्ही संघ सामना खेळण्यासाठी सज्ज आहेत. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात यूएईचा ९ विकेट्सने पराभव केला तर पाकिस्तानने ओमान विरुद्धचा पहिला सामना ९३ धावांनी जिंकला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरील पिच फलंदाज की गोलंदाज कोणासाठी उपयुक्त ठरणार की पावसामुळे सामना रद्द होणार,कसा असेल हवामानाचा अंदाज, जाणून घेऊयात.
हवामान कसे असेल?
संयुक्त अरब अमिराती हा अशा देशांपैकी एक मानला जातो जिथे खूप उष्णता असते. AccuWeather च्या अहवालानुसार, १४ सप्टेंबर रोजी दुबईचे तापमान ३९ अंश असण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, आर्द्रता ४४ अंशांपर्यंत जाऊ शकते. सामना सुरू झाल्यावर रात्री काही प्रमाणात उष्णतेपासून आराम मिळेल. परंतु ,रात्री तापमान ३० अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. रात्री दव देखील महत्वाचा घटक ठरु शकतो, ज्यामुळे नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पिच रिपोर्ट
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या पिच रिपोर्टनुसार, ही पिच फिरकी गोलंदाजांसाठी अधिक उपयुक्त आहे. या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजाचे वर्चस्व गाजू शकते. पण त्याचबरोबर वेगवान गोलंदाजही प्रभावी ठरु शकतात. म्हणून फलंदाजांना या पिचवर धावा करणे तितके सोपे असणार नाही. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आतापर्यंत एकूण ११२ टी-२० सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी ५२ सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने आणि ५९ सामने दुसऱ्या फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. भारतीय संघ सध्या ग्रुप-ए च्या पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. जर टीम इंडियाने हा सामना जिंकला तर सुपर-४ मध्ये त्याचे स्थान जवळजवळ निश्चित होईल.
भारताचा पाकिस्तानवर दबदबा
या स्टेडियमवर टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये तीन टी-२० सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी पाकिस्तानने दोनतर भारताने एक सामना जिंकला आहे. आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानवर दबदबा कायम ठेवला आहे. आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये १९ सामने झाले आहेत. यापैकी १० सामने भारताने जिंकले आहेत तर पाकिस्तानने फक्त सहा सामने जिंकले आहेत. तर तीन सामने अनिर्णीत राहिले आहेत. रविवारी होणाऱ्या सामन्यात खेळासोबतच भावनांचा संघर्षही दिसून येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.