इंग्लंडविरोधात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची उद्या, शनिवारी निवड होणार आहे. पण त्याआधीच टीम इंडियासाठी धक्कादायक बातमी आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयची निवड समिती अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला संधी देण्याच्या विचारात नाही. तर गोलंदाजीचा कणा असलेला यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह देखील काही सामन्यांसाठी उपलब्ध नसेल.
बीसीसीआयच्या मेडिकल टीमच्या म्हणण्यानुसार, ३४ वर्षीय मोहम्मद शमी हा कसोटी सामन्यात दीर्घ वेळ गोलंदाजी करण्यासाठी अद्याप तंदुरुस्त नाही. त्यामुळे तो सर्वच्या सर्व पाच कसोटी सामने खेळणार की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे निवड समिती प्रमुख अजित आगरकर हे दीर्घ वेळ गोलंदाजी करू शकतील अशा तंदुरुस्त गोलंदाजांना संघात घेण्याबाबत विचार करत आहेत.
मोहम्मद शमीला संघात स्थान देण्याबाबत, तसेच काही सामने खेळवण्यावर चर्चा करण्यात आली आहे. शमीचं फिटनेस बघता त्याला संघात संधी दिली जाईल की नाही याबाबत साशंकता आहे. दुसरीकडे, तीन कसोटी सामन्यांपेक्षा जास्त खेळणे सध्या तरी अशक्य आहे, असे जसप्रीत बुमराह यानं आधीच बीसीसीआयला कळवलं आहे. त्यामुळे अशा गोलंदाजांना संधी देण्याबाबत खुद्द निवड समिती द्विधा मनस्थितीत आहे. तसेच सर्वच्या सर्व सामने खेळण्याबाबत अनिश्चतता असलेल्या गोलंदाजांचा भरणा संघात केला तर, त्याचा संघाच्या नियोजनावर परिणाम होऊ शकतो, अशीही एक वेगळी भीती आहे.
बीसीसीआयच्या सूत्रांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, शमी सध्या आयपीएल खेळत आहे. हैदराबाद संघासाठी केवळ चारच षटके गोलंदाजी करत आहे. त्यामुळे कसोटीच्या दिवसभराच्या खेळात तो १० षटकांपेक्षा अधिक षटके गोलंदाजी करू शकेल का, याबाबत शंका आहे. इंग्लंड दौऱ्यात वेगवान गोलंदाजांकडून सर्वाधिक षटके टाकणे अपेक्षित आहे. त्यामुळे तंदुरुस्त नसलेल्या गोलंदाजांना संधी देऊन कोणतीही जोखीम पत्करू शकत नाही. शमी हा शेवटचा कसोटी सामना दोन वर्षांपूर्वीच म्हणजे २०२३ मध्ये ओव्हलच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता.
शमी शस्त्रक्रियेमुळं जवळपास वर्षभर क्रिकेटपासून दूर होता. यावर्षी टी २० सामन्यांमधून त्यानं पुनरागमन केलं होतं. त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळला होता. पण महत्वाच्या स्पर्धांमध्ये म्हणजेच टी २० वर्ल्डकप आणि बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये तो सहभागी होऊ शकला नव्हता.
रोहित शर्मा याने कसोटीतून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे कसोटी संघाच्या नव्या कर्णधाराची घोषणा करावी लागणार आहे. अजित आगरकर यांच्या नेतृत्वातील पाच सदस्यांची निवड समिती नव्या कर्णधाराची घोषणा करतील. शुभमन गिलचं नाव सध्या आघाडीवर आहे. सूत्रांनुसार, अलीकडेच शुभमन गिल याची प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांच्यासोबत चर्चा झाली होती.
मोहम्मद शमी संघातून बाहेर झाला तर युवा वेगवान गोलंदाजांना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यात अर्शदीप सिंग आणि हरयाणाच्या अंशुल कंबोजला संधी मिळू शकते. कंबोजने आतापर्यंत २२ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ७४ विकेट घेतल्या आहेत. इंग्लंड दौऱ्याआधी इंडिया ए संघात त्याला संधी देण्यात आली आहे. तर अर्शदीपकडे इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.