सलग तिनदा शून्यावर बाद झाल्यानंतर टीकेचा धनी ठरलेला भारताचा तडाखेबंद फलंदाज अभिषेक शर्मा यानं टी २० वर्ल्डकपमधील धावांचा दुष्काळ अखेर संपुष्टात आणला आहे. सुपर ८ मधील करो या मरो लढतीत झिम्बाब्वेविरुद्ध युवा फलंदाजानं तुफानी अर्धशतकी खेळी करून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. टी २० वर्ल्डकपमधील हे त्याचे पहिले अर्धशतक आहे.
टी २० वर्ल्डकप स्पर्धेत आतापर्यंत अभिषेक शर्मा अपयशी ठरला. मात्र, अत्यंत महत्वाच्या सामन्यात अभिषेकची बॅट तळपली. जोरदार कमबॅक करताना त्यानं अवघ्या २६ चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकलं. या स्फोटक खेळीत तीन चौकार आणि चार उत्तुंग षटकारांचा समावेश होता. त्याचा स्ट्राइक रेट १९२ च्या आसपास होता.
अभिषेक शर्मानं टी २० वर्ल्डकप स्पर्धेत चांगली सुरुवात केली नाही. सुरुवातीच्या तीन सामन्यांत त्याला एकही धाव करता आली नव्हती. सलग तीन सामन्यांत शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर सुपर ८ फेरीतील पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याला सूर गवसला नाही. अवघ्या १५ धावा करून तो बाद झाला होता. अभिषेकवर टीकाही झाली होती. त्याला प्लेइंग ११ मध्ये संधी देऊ नये, अशा प्रतिक्रिया क्रिकेट चाहत्यांकडून तसेच माजी क्रिकेटपटूंकडून येत होत्या. मात्र, अत्यंत महत्वाच्या सामन्यात अभिषेकवर टीम व्यवस्थापनानं विश्वास ठेवला आणि त्यानं तो सार्थ देखील ठरवला.
झिम्बाब्वेच्या विरोधात अभिषेकनं जोरदार कमबॅक केलं. चेन्नईच्या मैदानात त्यानं धावांचा 'अभिषेक' घातला. ३० चेंडूंमध्ये त्यानं ५५ धावा केल्या. संजू सॅमसनच्या जोडीनं त्यानं संघाला जोरदार सुरुवात करुन दिली. या दोघांच्या तुफानी फटकेबाजीमुळं भारताला पॉवर प्लेमध्येच ८० धावांचा डोंगर उभारता आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.