पश्चिम बंगाल सरकारने प्रशासकीय पातळीवर मोठा फेरबदल करत 23 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक महत्वाच्या विभागांमधील जबाबदाऱ्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. वित्त, कृषि, अन्न व पुरवठा, गृहनिर्माण, माहिती तंत्रज्ञान, नगर पालिका, पर्यटन आणि कामगार अशा महत्वाच्या विभागांवर बदल केला आहे. मुख्य सचिवांनी आदेश जारी केले असून हे बदल तात्काळ लागू करण्यात आले आहेत.
वाणिज्य कर आयुक्त खलिद अयाज अन्वर यांची वित्त विभागात सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर कृषि विभागातील वरिष्ठ विशेष सचिव सुरेंद्र कुमार मीना यांच्याकडे वाणिज्य कर आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.वित्त विभागाच्या वरिष्ठ विशेष सचिव डॉ. उमा शंकर एस यांची गृहनिर्माण विभागाच्या वरिष्ठ विशेष सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री कार्यालयातील सचिव मोहम्मद अब्दुल शाहिद यांची वित्त विभागात सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंचायतराज आणि ग्रामीण विकास विभागाच्या सचिव प्रियदर्शनी भट्टाचार्य यांच्याकडेही वित्त विभागातील सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
माहिती व सांस्कृतिक व्यवहार विभागातील माहिती संचालक अंशुल गुप्ता यांची अन्न व पुरवठा विभागात जिल्हा वितरण, खरेदी व पुरवठा संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे पश्चिम बंगाल अत्यावश्यक वस्तू पुरवठा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभारही सोपवण्यात आला आहे.
कृषी विभागातील विशेष सचिव चिन्मय डे यांची दुर्गापूर येथील विशेष आयुक्त, जीएसटी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम बर्धमानचे अतिरिक्त जिल्हाधिकारी सुमन सौरव मोहंती यांच्याकडेही दुर्गापूर येथील विशेष आयुक्त, जीएसटी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मालदाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीनिवास व्यंकटराव पाटील यांची पश्चिम बंगाल कृषी विपणन महामंडळ लिमिटेड अर्थात ‘सुफल बांग्ला’च्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.