उत्तर प्रदेशातील लखनौहून कैंची धामला जाणाऱ्या एका कुटुंबाचा भीषण अपघात झाला. भवाली परिसरात ५०० मीटर खोल दरीत कार कोसळली असून चालकासह एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना उत्तराखंडच्या नैनिताल जिल्ह्यात घडली. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलंय.
अपघाताची माहिती मिळताच, पोलीस आणि एसडीआरएफची पथके घटनास्थळी दाखल झाली आणि स्थानिक रहिवाशांच्या सहकार्याने मदत व बचाव कार्य सुरू केले. मुख्यमंत्री धामी यांनी जिल्हा प्रशासनाला बचाव आणि मदत कार्याला गती देण्याचे निर्देश दिलेत. कठीण परिस्थिती असतानाही सर्वांना तातडीने बाहेर काढत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी पाचही जणांना मृत घोषित केले. मुख्यमंत्री धामी यांनी शोकाकुल कुटुंबियांना आपले सांत्वनही व्यक्त केले.
नैनितालचे पोलीस अधीक्षक (गुन्हे) डॉ. जगदीश चंद्र यांनी सांगितले की, अपघातात मृत पावलेले कुटुंब लखनौचे असून ते सॅनिटोरियम-रातीघाट बायपासमार्गे कैंची धामला जात होते. धैला गावाच्या आधी त्यांची गाडी अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि ५०० मीटर खोल दरीत कोसळली. नैनितालचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) मंजुनाथ टी.सी. यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले, परंतु दुर्गम भूभागामुळे मदतकार्य अत्यंत आव्हानात्मक होते. भूपेंद्र सिंग चुफल (४८), सीमा कैदा चुफल (४५), वासू चुफल (१९), रवी चुफल (१२) आणि चालक अनुज कुमार मिश्रा (३४) अशी मृतांची नावे असल्याचं पोलिसांनी सांगितले.
स्थानिक लोकांनी आरोप केला की, अपघाताचे ठिकाण हे कैंची धामसाठी जाण्यासाठी एक प्रस्तावित बायपास मार्ग आहे. त्याचे बांधकाम अजूनही सुरू आहे. मार्गावरील अनेक ठिकाणी सुरक्षा उपाययोजना अपुऱ्या आहेत आणि तीव्र वळणांवर अतिरिक्त सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.