‘ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ हे नवं नाव आणि ‘फुटबॉलपटू’ चिन्ह देण्यात आले आहे.
अरूप रॉय गटाला ‘डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस’ नाव आणि ‘लिफाफा’ चिन्ह देण्यात आले आहे.
नवीन नाव-चिन्हाची व्यवस्था आगामी पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने टीएमसी (TMC) वादाबाबत एक नवीन आदेश जारी केला आहे. या नवीन आदेशानुसार, दोन्ही गटांना नवीन नाव आणि नवीन निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. तृणमूल काँग्रेसमधील फुटीच्या पार्श्वभूमीवर आयोगाने १८ सप्टेंबर रोजी हा महत्त्वपूर्ण आदेश जारी केला. १७ सप्टेंबर रोजी पक्षाचे नाव आणि 'फूल व गवत' हे चिन्ह गोठवल्यानंतर आयोगाने अंतरिम आदेश जारी केला आहे.
अरूप रॉय आणि रितब्रत बॅनर्जी यांच्या गटाला 'डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस' हे नाव आणि 'लिफाफा' (Envelope) हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे.ममता बॅनर्जी यांच्या गटाला 'ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस' हे नवीन नाव आणि 'फुटबॉल खेळाडू' (Football Player) हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. हे दोन्ही गट पश्चिम बंगाल, मेघालय आणि त्रिपुरामध्ये मान्यताप्राप्त पक्ष म्हणून ओळखले जातील.
टीएमसीचे दोन्ही गट पक्षाचे नाव आणि मूळ निवडणूक चिन्हावर आपापला दावा करत होते, त्यानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय दिलाय. गुरुवारी निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना आगामी पोटनिवडणुकीत 'तृणमूल काँग्रेस' हे नाव आणि पक्षाचे राखीव निवडणूक चिन्ह असलेल्या 'फुले आणि गवत'चा वापर करण्यास मनाई केली.
पश्चिम बंगालमधील नंदीग्राम आणि रेजीनगर विधानसभा मतदारसंघांसाठी ६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीला ही बंदी लागू असेल. दोन्ही प्रतिस्पर्धी गटांना समान पातळीवर आणण्यासाठी आणि त्यांचे हक्क व हितसंबंध जपण्यासाठी ही तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रकरणावर अंतिम निर्णय नंतर दिला जाईल, असेही आयोगाने नमूद केलंय.
जेव्हा बंडखोर नेते रिताब्रत बॅनर्जी यांनी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील 'राष्ट्रीय कार्यकारिणी'च्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, त्यानंतर हा वाद निर्माण झाला. या समितीचा कार्यकाळ ११ फेब्रुवारी २०२५ रोजी संपला होता, असा दावा त्यांनी केला होता. परिणामी त्यांनी त्यानंतर घेतलेले निर्णय आणि केलेल्या नियुक्त्या अवैध असल्याचे जाहीर केले. दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील गटाने हा दावा फेटाळून लावलाय. त्यांनी असा युक्तिवाद केला की, रितब्रत यांच्या गटाने पक्षाच्या जुन्या घटनेतील तरतुदींचा आधार घेतला होता आणि आयोगाकडे नंतर सादर केलेल्या सुधारणांकडे दुर्लक्ष केले होते.
काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिलीय. भाजप आणि निवडणूक आयोग विरोधी पक्षांना कमकुवत करण्यासाठी संगनमताने काम करत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय. राहुल गांधींनी या घटनांना 'पक्ष चोरणे' असं म्हटलंय. तर अशा घटनांमुळे देशातील लोकशाहीच्या ऱ्हास होतोय असं म्हटलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.