Surabhi Jayashree Jagdish
समाजात आपल्याला मान-सन्मान मिळावा, प्रत्येकाने आपल्याला आदराने वागवावे, अशी इच्छा अनेकांची असते. मात्र हा सन्मान मिळवण्यासाठी पैसा, मोठे पद किंवा सत्ता असणे आवश्यक नाही. आपल्या रोजच्या वागण्या-बोलण्यातूनही आपण इतरांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करू शकतो. चाणक्य नीतीमध्ये अशाच काही सवयींवर भर देण्यात आला आहे.
काही व्यक्तींना त्यांच्या स्वभावामुळे आणि वागण्यामुळे सहज मान मिळतो. मात्र हा आदर टिकवण्यासाठी सातत्याने चांगलं आचरण ठेवा. विश्वासू स्वभाव, इतरांचा आदर आणि प्रसंगी शांत राहण्याची सवय यामुळे व्यक्तीची समाजातील प्रतिमा चांगली बनते.
कोणालाही आश्वासन देणं सोपं असतं. पण दिलेला शब्द पूर्ण करणं महत्त्वाचं आहे. एखादं काम वेळेत पूर्ण करणं, कोणीतरी विश्वासाने सांगितलेली गोष्ट गुप्त ठेवणं आणि दिलेलं वचन पाळणं या गोष्टींमुळे तुमच्यावरचा विश्वास वाढतो.
चांगला संवाद म्हणजे सतत स्वतः बोलत राहणं नव्हे. समोरची व्यक्ती काय सांगतेय, तिचं मत काय आहे, हे शांतपणे ऐकणेही तितकंच महत्त्वाचं आहे. बोलताना मध्येच अडथळा न आणता समोरच्याचं म्हणणं ऐकण्याची सवय लावा.
परिस्थिती आपल्या विरोधात गेली किंवा तणावाची वेळ आली तरी लगेच रागावणं किंवा घाबरून जाणं टाळा. अशा वेळी शांत राहून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करा. दबावाच्या प्रसंगी स्वतःवर नियंत्रण ठेवणाऱ्या व्यक्तीमध्ये समजूतदारपणा आणि जबाबदारीची भावना दिसते.
ज्ञान मिळवण्याची आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्याची तयारी असणाऱ्या व्यक्तीला लोकांकडून वेगळा आदर मिळतो. वय किंवा परिस्थिती कोणतीही असो, सतत काहीतरी नवीन शिकण्याची सवय ठेवावी. आपल्या चुका समजून घेऊन त्यातून शिकणं आणि स्वतःमध्ये चांगले बदल घडवून आणणं यामुळे व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी बनतं.
एखादी व्यक्ती श्रीमंत आहे की गरीब, मोठ्या पदावर आहे की सामान्य आहे, यावरून तिच्याशी वागण्याची पद्धत बदलू नये. प्रत्येकाशी नम्रपणे आणि चांगल्या वागणुकीने बोलणं महत्त्वाचं आहे. छोट्या गोष्टींमधूनही चांगला स्वभाव दिसून येतो. एखाद्याने मदत केली तर मनापासून धन्यवाद देणं किंवा गरज असताना दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणं यामुळेही मनात आदर निर्माण होतो.