पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा सोशल मीडियावर एक्टिव्ह झाले असून तरुणांशी थेट संवाद साधण्यावर त्यांनी विशेष भर दिलाय. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांनी पुन्हा एकदा व्हिडिओ शेअर करून संवाद साधला. सोशल मीडियाच्या माध्यमातून हा संवाद पुढेही असाच कायम राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. गुरुवारी त्यांनी शेअर केलेल्या सेल्फी व्हिडिओला मिळालेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानलेत.
मोदी म्हणाले, "थँक्यू फ्रेंड्स. काल रात्री उशिरा तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. मी शेअर केलेल्या व्हिडिओवर तुम्ही भरभरून प्रतिक्रिया दिल्या, अनेक सकारात्मक सूचना केल्या. त्या सर्वांसाठी मी मनापासून आभारी आहे. तुमचं हे प्रेम कायम राहो आणि आपला संवाद यापुढेही अधिक एक्टिव्हपणे सुरू राहो. पुन्हा एकदा सर्वांचं धन्यवाद."
हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अवघ्या २० मिनिटांत त्याला १० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले.
यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतही पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचण्याची गरज व्यक्त केली होती. बुधवारी झालेल्या बैठकीत त्यांनी आपल्या मंत्र्यांना विशेषतः इन्स्टाग्रामवर एक्टिव्ह राहण्याचा सल्ला दिलाय.
सूत्रांच्या माहितीनुसार, बैठकीदरम्यान त्यांनी त्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडे इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्ही किती एक्टिव्ह असता असा प्रश्न केला.
मोदी यांनी सांगितलं की, इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग एक्टिव्ह असतो. त्यामुळे सरकारनेही या माध्यमातून त्यांच्याशी थेट संपर्क वाढवावा आणि संवाद अधिक मजबूत करावा.
गुरुवारी रात्री ११.५२ वाजता, पंतप्रधान मोदी यांनी एक सेल्फी व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये त्यांनी थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधत NEET पेपरफुटी प्रकरणावर सरकार गंभीर असल्याचा संदेश दिला. विद्यार्थ्यांना सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचा विश्वास त्यांनी दिला. पेपरफुटी ही किरकोळ घटना नसून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, शुक्रवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रस्तावित कायद्यावरही चर्चा होणार असल्याची माहिती आहे. या कायद्यात अशा प्रकरणांची जलद सुनावणी करण्यासाठी फास्ट-ट्रॅक न्यायालयांची व्यवस्था करण्याचा तसंच परीक्षांमध्ये गैरव्यवहार करणाऱ्यांवर कठोर शिक्षेची तरतूद करण्याचा प्रस्ताव आहे.
दिल्लीतील जंतर-मंतरवर गेल्या काही दिवसांपासून कॉकरोच जनता पार्टी (CJP) यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सीजेपीकडून करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.