भारतात मान्सून यंदा वेळेआधीच दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, केरळमध्ये मान्सूनचं २४ किंवा २५ मे रोजीच आगमन होऊ शकतं. नेहमीपेक्षा एक आठवडा आधीच मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
मागील १६ वर्षांत प्रथमच मान्सून वेळेआधीच पोहोचला आहे. मागील वेळी २००९ आणि २००१ मध्ये मान्सून २३ मे रोजी दाखल झाला होता. दुसरीकडं, मान्सूनपूर्व सरींनी महाराष्ट्रासह इतर राज्यांत धुमशान घातलं आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेशमध्ये गडगडाटासह पावसाचा इशारा दिला आहे. तर बिहार, झारखंड आणि ओडिशामध्ये २६ मेपर्यंत मुसळधारेचा अंदाज व्यक्त केला आहे. १५ हून अधिक राज्यांत पुढील काही दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून, २४ मेपर्यंत तो अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने २४ मे रोजी १५ राज्यांत पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विशेषतः महाराष्ट्र, केरळ, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, ओडिशा, बिहार, उत्तराखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात मुसळधारेची शक्यता व्यक्त केली आहे.
हवामान खात्यानुसार, तीन राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. केरळच्या काही जिल्ह्यांमध्ये २७ मे पर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गोव्यात २५ मे पर्यंत मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे. त्यासोबतच रेड अलर्ट जारी केला आहे. कर्नाटकातील उत्तर कन्नड, उडुपी, दक्षिण कन्नड, कोडागु, शिवमोग्गा, चिकमंगळूर आदी जिल्ह्यांत रेड अलर्टचा इशारा दिला आहे. या दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार
उत्तर प्रदेश आणि गुजरातसह सहा राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, गुजरातच्या जुनागढ, अमरेली, भावनगर आणि गिर सोमनाथ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
तेलंगणाच्या काही जिल्ह्यांत वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तामिळनाडूच्या चेन्नई, कांचीपुरम, कन्याकुमारी, तेनकासी, तिरुनेलवेली, निलगिरी आणि कोइम्बतूर जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.
मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात वादळी वारे, विजांसह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातही अशाच स्वरुपाचा पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. उत्तर प्रदेशातील महाराजगंज, तसेच हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
बिहारसाठीही वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे. २४ मे रोजी राज्याच्या अनेक भागांत ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. २७ मे पर्यंत पाऊस कोसळेल, अशीही शक्यता आहे. दिल्लीत आज, शनिवारी उष्णता वाढेल. कमाल तापमान ३७ अंश सेल्सियस आणि किमान ३० अंश सेल्सियस असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.