ठाण्यात राज ठाकरे – एकनाथ शिंदे भेट
उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय चर्चेत
कल्याण-डोंबिवली निवडणुकीमुळे वाढलाय.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राज व उद्धव ठाकरे एकत्र आले. ठाकरे बंधुंनी एकत्र येत महापालिका निवडणूक लढली. इतकेच नाही तर पुढील काळातही एकत्र राहू, अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी केली. परंतु कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिंदे सेनेला मनसेनं दिलेल्या पाठिंब्यामुळे दोन्ही पक्षाच्या संबंधात दुरावा निर्माण झालाय असं चित्र दिसतंय.
ठाकरे बंधूंनी एकत्र येत महापालिका निवडणूक लढली,पण त्या निवडणुकीत मनसे व उद्धव ठाकरे यांच्या युतीचा पराभव झाला होता. त्यामुळे ठाकरे बंधूंचे मुंबई महापालिका ताब्यात ठेवण्याचे स्वप्न भंगले होते. त्यातच कल्याण डोंबविली महापालिका निवडणुकीत मनसेने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने चंद्रपूरमध्ये भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे दोघांनाही एकमेकांवर टीका केली होती.
त्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यामुळे दोन्ही गटातून उलटसुलट प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे. दरम्यान भेटीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला तीन स्वीकृत नगरसेवक पद येत आहेत. त्यापैकी एक नगरसेवकपद उद्धव ठाकरे यांनी मनसेला द्यावे, अशी मागणी केली जात होती. त्यातच आता उद्धव ठाकरे यांनी यासाठी त्यांच्या पक्षातील तीन स्वीकृत नगरसेवकांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय.
त्यामुळे हा राज ठाकरे यांच्या मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. स्वीकृत नगरसेवक पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे इच्छुकांची मोठी यादी होती. त्यामध्ये आता साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर, कैलास पाठक या तीन नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. उद्धव ठकरे यांनी त्यांच्या पक्षातील तीन जणांना या पदावर संधी दिली आहे. त्यामुळे आता मनसेच्या अपेक्षांवर पाणी फेरल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
याच दरम्यान शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी फेसबूक पोस्ट करत उद्धव ठाकरेंना टोला लगावला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे साहेब यांच्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. अनेकांना पोटशूळही उठला. पण बाळासाहेबांच्या मुशीतून घडलेले दोन कार्यकर्ते हिंदुत्वाच्या विचारासाठी, बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी एकत्र येणार असतील तर आनंद होईल. त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.
दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनीही राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिलीय. आम्ही त्याची हेरगिरी करत नाही. कोण कुणाला भेटतं त्यावर बंधनं नाही. एकनाथ शिंदे या प्रवृत्तीवरून आमचे टोकाचे भांडण आहे. कारण एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसलाय. बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी केली. कारण त्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा विचार आहे. एकनाथ शिंदेंचे हे नंदनवन बेईमानीतून निर्माण झाल्याचं राऊत म्हणाले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.