महाराष्ट्रानंतर आता हरयाणातील महिलांसाठी आनंदवार्ता आहे. महाराष्ट्रात महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना लागू केली असून, हरयाणा सरकारनंही महिलांसाठी लाडो लक्ष्मी योजनेची घोषणा केली आहे. या योजनेतील लाभार्थींना दर महिन्याला २१०० रुपये मिळणार आहेत. या योजनेसाठी २०२५-२६ या आर्थिक वर्ष पाच हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एप्रिल २०२५ पासून ही योजना लागू करण्याची तयारी सुरू आहे. २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक जाहीरनाम्यात या योजनेची घोषणा केली होती.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलांच्या आर्थिक सशक्तिकरणाच्या दिशेनं हरयाणा सरकारनं मोठं पाऊल टाकलं आहे. सरकारनं लाडो लक्ष्मी योजनेची (Haryana Government Launches Lado Laxmi Yojana for Women) घोषणा केली आहे. याअंतर्गत महिलांना दरमहा २१०० रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
या योजनेसाठी २०२५ - २६ या आर्थिक वर्षात सरकारने पाच हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे, अशी माहिती हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी दिली. महिलांना प्रत्येक महिन्याला २१०० रुपये मिळणार आहेत. या पैशांतून महिलांना आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी मदत होऊ शकते, असेही ते म्हणाले.
सत्ताधाऱ्यांनी शब्द पाळला
आम्ही महिलांना दरमहा २१०० रुपये आर्थिक मदत देण्याचा संकल्प केला होता. तो पूर्णत्वाला नेण्यासाठी लाडो लक्ष्मी योजना लागू करण्याची तयारी सुरू केली आहे. १८ वर्षांपेक्षा अधिक वय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती हरयाणा सरकारमधील एका मंत्र्यानं दिली.
महिलांना मिळणार आर्थिक मदत
२०२४ मध्ये हरयाणा विधानसभा निवडणूक झाली होती. त्यावेळी भाजपने विधानसभा निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यात या योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार महिलांना दरमहा आर्थिक साह्य देण्याचे नमूद करण्यात आले होते. आता राज्य सरकारने या योजनेचा लाभ निकषांमध्ये बसणाऱ्या संबंधित महिलांपर्यंत पोहोचवण्याची पूर्ण तयारी केली आहे, असेही एका मंत्र्याने सांगितले.
ही योजना हरयाणा सरकारने महिला सशक्तीकरणाच्या दिशेने उचललेले महत्वाचे पाऊल असून, राज्यातील महिलांना केवळ आर्थिक मदत नाही, तर त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदतगार ठरेल, असा विश्वासही सत्ताधाऱ्यांनी व्यक्त केला.
महिलांना एक लाखंपर्यंतचं कर्ज व्याजमुक्त
हरयाणाच्या सैनी सरकारनं महिला शेतकऱ्यांसाठीही मोठी घोषणा केली. डेअरी फार्म, फळबाग, पशुपालन, मत्स्यपालन करणाऱ्या महिला शेतकऱ्यांना एक लाखांपर्यंतचं कर्ज व्याजमुक्त असणार आहे. मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी अर्थसंकल्पात तशी घोषणा केली.
यंदा हरयाणा सरकारनं २ लाख ५ हजार १७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात १३. ७ टक्क्यांनी वाढ केली आहे. शेतकरी आणि महिलांसाठी या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.