कॉक्रोच जनता पार्टीने (CJP) ५ सप्टेंबर २०२६ रोजी नवी दिल्लीत शांततापूर्ण निषेध मोर्चा काढण्याची देशभरात हाक दिली आहे. २५ जुलै रोजी तरुणांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप पक्षाने केला. सरकारनं मागण्या मान्य केल्यानंतर जंतर-मंतरवरील आंदोलन मागे घेण्यात आले होते. ५ सप्टेंबर रोजी निघणारा हा शांततापूर्ण मोर्चा इंडिया गेटपासून सुरू होऊन नवी दिल्ली पोलीस मुख्यालयाकडे जाणाऱ्या मार्गाने पुढे जाईल. या मोर्चाचे नेतृत्व नीट पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे कुटुंबीय आणि पोलीस अत्याचाराला सामोरे जाणाऱ्या तरुणांचे कुटुंबीय करतील; तसेच देशभरातील विद्यार्थी, युवा संघटना आणि तरुण नागरिक यात सहभागी होण्याची शक्यता आहे.
नीट पेपरफुटीनंतर कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतर-मंतर येथे जोरदार आंदोलन केले होते. या आंदोलनाला त्यांना सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची साथ मिळाल्याने या आंदोलनाची तीव्रता वाढली आणि देशभरातून तरुणाई ही दिल्लीत जमा झाली होती. त्यावेळी या तरुणांनी संसदेवर मोर्चा काढला. मात्र, यामध्ये अनेकजणांवर लाठीचार्ज,अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. अनेक तरुण गंभीररित्या जखमी देखील झाले होते. यानंतर कॉक्रोच जनता पार्टीला सर्वच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पाठिंबा दर्शवला.
अखेर सरकार झुकलं आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. मात्र, कॉक्रोच जनता पार्टीच्या काही प्रमुख नेत्यांची सरकारच्या शिष्टमंडळासोबत बैठक पार पडली. या बैठकीत त्यांच्या मागण्या लवकरच पूर्ण होतील असे सरकारकडून आश्वासन देण्यात आलं. मात्र अद्याप एकही आश्वासन सरकारनं पूर्ण केले नसल्याचा आरोप अभिजीत दिपके यांनी केला. यामुळे पुन्हा एकदा आम्ही शांततेत मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी घोषणा केली. दरम्यान आता या मोर्चाआधी मोदी सरकार या दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.