पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार
बड्या नावांची चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही नव्या मंत्र्यांची मंत्रिमंडळात एन्ट्री होण्याची शक्यता आहे. तर काही मंत्र्यांचा पत्ता कट होऊ शकतो, असाही अंदाज वर्तवला जात आहे. केंद्र सरकारकडून अद्याप मंत्रिमंडळ फेरबदलाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नसली, तरी हा निर्णय उद्या म्हणजेच मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यानंतर या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
संसदेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरू होत असून त्यापूर्वी मोठी राजकीय घोषणा होऊ शकते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांनंतरचा हा पहिलाच मंत्रिमंडळ फेरबदल असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. फेरबदलात कोणाला संधी मिळणार याबाबत अद्याप स्पष्टता नसली, तरी काही नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजप खासदार अरुण गोविल, शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे, आरबीआयचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास, बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार, संजय दिना पाटील, व्ही. डी. शर्मा, तरुण चुघ आणि राघव चड्ढा यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते, अशी चर्चा आहे.
दरम्यान, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे नावही चर्चेत असून त्यांच्या खात्यात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय रवनीत सिंग बिट्टू आणि हरदीप सिंग पुरी यांच्या जबाबदाऱ्यांमध्येही फेरबदल होऊ शकतो.
केंद्रीय मंत्री बी. एल. वर्मा यांचा राज्यसभेतील कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपत असल्याने त्यांच्या भूमिकेबाबतही चर्चा सुरू आहे. तसेच मनोहरलाल खट्टर आणि निर्मला सीतारामन यांच्या खात्यांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात असली, तरी यासंदर्भात कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे आगामी काही दिवसांत केंद्राच्या राजकारणात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.