समृद्ध समाजनिर्मितीसाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून शेती, युवक, महिला, शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रात खूप मोठे सामाजिक कार्य सुरू आहे. या माध्यमातून समर्पित भावनेने लक्ष केंद्रित करत, जिद्द, चिकाटी, मेहनत घेत, अडचणीत तग धरून राहत, सकारात्मक आणि सातत्य ठेवत काम करणारी ही आजची तरुण पिढी सर्वांसाठी प्रेरक आहे. भारताचे भविष्य असणाऱ्या तरुणांना यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार देताना अभिमान वाटतो, असं भाष्य राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं. ते राज्यस्तरीय युवा पुरस्कार प्रदान सोहळ्यात बोलत होते.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने महाराष्ट्राच्या सर्वागीण विकासासाठी विविध क्षेत्रात विधायक, भरीव व विशेष कामगिरी करणाऱ्या युवक-युवतींना पुरस्कार दिला जातो. या यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार सोहळ्याचे आज शुक्रवारी एमजीएम परिसरातील रुक्मिणी सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते. यावेळी टोपे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
राजेश टोपे कार्यक्रमात म्हणाले की, आज शुक्रवारी विविध क्षेत्रातील सर्व तरुण समाजाच्या भल्यासाठी काम करत आहेत. ते विशेषत: सामान्य नागरिकांचे जीवन सुखमय आणि आनंददायी होण्यासाठी कार्य करत आहे. ही तरुणाई आपापल्या क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपत सातत्यपूर्ण कार्यरत आहे. या सर्वांनी कामांतून 'नोकरी मागणारे होण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा' हाच संदेश दिलेला आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजासाठी कार्य करणाऱ्या सर्वांना प्रेरणा आणि बळ देण्याचे काम करत आहे.
भारताला संतांच्या विचारांची फार मोठी परंपरा आहे. भगवान बुद्धाने उदात्त धर्माची दिलेली शिकवण जगासाठी मार्गदर्शक ठरली. अशा समृद्ध विचारपरंपरा लाभलेल्या देशात जाती-धर्माच्या नावाने होणारे वाद बघून मन विषन्न होतं. वडीलधाऱ्या माणसाने तरुणांना याविषयी योग्य मार्ग दाखवला पाहिजे. आपण कुठे चुकत आहोत, हे दाखवून दिले पाहिजे. यशवंतराव चव्हाण सेंटरने यासाठी पुढील काळात काम केलं पाहिजे. संधीची नवनवीन क्षितिजे उपलब्ध होत असताना आता या तरुणांनी न थांबता, अथक परिश्रमातून नवनवीन विक्रम स्थापित केले पाहिजेत, असे यशवंतराव चव्हाण सेंटरच्या जिल्हा केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम यांनी यावेळी सांगितले.
मानद कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ यावेळी बोलताना म्हणाले, आज यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार प्राप्त करणारे सगळे युवक-युवती समाजाच्या भल्यासाठी अनेक महत्वाच्या विषयावर काम करत आहेत. माध्यमे याची दखल घेत असतील किंवा नाही. मात्र, आज यशवंतराव चव्हाण सेंटरने यांच्या कामाची दखल घेतली आहे. आपली आवड जोपासत ही सगळी तरुण मंडळी आपले सर्वस्व झोकून देऊन काम करत आहेत. समाजातील तळागाळात काम करणाऱ्या व्यक्तींमुळे महाराष्ट्र चालतोय.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात ७ विविध विभागांमध्ये एकूण १६ पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रातील युवकांच्या कार्याचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा. तसेच प्रोत्साहन मिळावे, हे या पुरस्कारांचे उद्दिष्ट आहे.
पुरस्काराचे स्वरूप
रोख २१ हजार रुपये स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्काराचे स्वरुप आहे.
यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार २०२४-२५ सालचे मानकरी
पत्रकारिता :
प्रथमेश पाटील (पुणे)
ज्योती वाय. एल. (मुंबई)
उद्योजक :
जयेश टोपे (नाशिक)
शिवानी सोनवणे (पुणे)
रंगमंचीय कलाविष्कार :
कृष्णाई उळेकर, धाराशिव (लोककला)
तन्वी पालव, सिंधुदुर्ग (शास्त्रीय नृत्य)
ऋतुजा सोनवणे, जळगाव (शास्त्रीय संगीत)
कल्पेश समेळ, रायगड (नाट्य)
साहित्य :
विनायक होगाडे (कोल्हापूर)
मृदगंधा दीक्षित (पुणे)
सामाजिक :
आकाश टाले (नागपूर)
ऋतुजा जेवे (बुलढाणा)
इनोव्हेटर :
सुश्रुत पाटील (पालघर)
पद्मजा राजगुरू (परभणी)
क्रीडा :
ओजस देवतळे, नागपूर (क्रीडा प्रकार : धनुर्विद्या)
हृतिका श्रीराम, सोलापूर (डायव्हिंग)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.