विकास मिरगणे, नवी मुंबई प्रतिनिधी
Navi Mumbai Atal Setu Incident : अटल सेतू पुलावरून एका तरुणाने समुद्रात उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या २८ वर्षीय तरुणाचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
उलवे पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या हरवलेल्या व्यक्तीच्या नोंदीनुसार, प्रतीक सुभाष रासकर (वय २८) या तरुणाने रविवारी (७ जून) पहाटे सुमारे १.२९ वाजण्याच्या सुमारास अटल सेतूवरून समुद्रात उडी मारली. या प्रकरणी उलवे पोलीस ठाण्यात 'मिसिंग' रजिस्टर क्रमांक ४८/२०२६ अंतर्गत नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक रासकर हा मूळचा पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रहिवासी असून, तो शेअर मार्केट क्लासेसशी संबंधित काम करत होता. घटनेपूर्वी तो आपल्या कुटुंबीयांना "बाहेर जेवण्यासाठी जातो," असे सांगून घराबाहेर पडला होता. त्यानंतर त्याने आपली कार अटल सेतूवर उभी केली आणि समुद्रात उडी मारली.
घटनेची माहिती मिळताच उलवे पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. समुद्रात उडी मारल्यानंतर संबंधित तरुणाचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे पोलीस, सागरी सुरक्षा यंत्रणा आणि बचाव पथकांकडून परिसरात कसून शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे प्रतीकच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण असून, त्याच्याबाबत कोणालाही काहीही माहिती मिळाल्यास तात्काळ उलवे पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दरम्यान, अटल सेतूवरून उडी मारण्याच्या वाढत्या घटनांमुळे पुलाच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा आत्मघातकी घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.