राज ठाकरे यांच्याकडून वाढत्या गुन्हेगारीवर चिंता व्यक्त
महिलांवरील अत्याचार आणि ड्रग्स तस्करीवरून ठाकरेंची जोरदार टीका
राज ठाकरेंकडून कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील वाढत्या महिलांवरील अत्याचार, अपहरण आणि ड्रग्स तस्करीच्या घटनांवर तीव्र चिंता व्यक्त केलीये. सरकारने विधिमंडळात दिलेल्या आकडेवारीचा दाखला दिला. त्यावरून राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले. दैवी शक्तीच्या नावाखाली किंवा राजकीय आश्रयाने महिलांचे शोषण होत असेल, तर त्यापेक्षा गंभीर बाब नाही, असेही ठाकरे म्हणाले. या प्रकरणातील सर्व दोषींना शोधून कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. दोषींवर कारवाई केल्याशिवाय संत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करण्याचा नैतिक अधिकार सत्ताधाऱ्यांना नसल्याचा टोला त्यांनी लगावला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकच्या अशोक खरात प्रकरणावर संताप व्यक्त केला. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित दोषींवर कडक कारवाईची मागणी केली. राज ठाकरे म्हणाले, 'अशोक खरात प्रकरणातील हिडीस तपशील वाचून शब्दशः गरगरल्यासारखं झालंय. काही दिवसांपूर्वी म्हणजे गुढीपाडव्याच्या मेळाव्यात महाराष्ट्राला किती सशक्त परंपरा लाभली आणि महाराष्ट्राने किती अद्वितीय माणसं या देशाला दिल्याचे सादरीकरण केलं होतं. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ते संत गाडगेबाबांपर्यंतचा ते अगदी आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरेंनी मराठी मनाची कशी मशागत केली हे दाखवलं होतं. त्याच महाराष्ट्रात अशोक खरातसारखा नीच माणूस, राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालतोय. खरंच, 'कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र' हा प्रश्न पडतोय'.
'महाराष्ट्रात राज्यकर्ते आशीर्वाद घ्यायचे, लोकमान्य टिळक यांच्यासारखे नेते भगवद्गीतेचा अर्थ लावणारा 'गीतारहस्य' सारखा ग्रंथ लिहायचे. त्याच महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांसारखे नेते आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यात संवाद असायचा. त्याच महाराष्ट्रात नेते तर्काला तिलांजली देऊन कुठलं तरी अजब 'तीर्थ' प्राशन करण्यासाठी अशोक खरातसारख्याच्या भजनी लागताहेत हे भीषण आहे, असे ठाकरे म्हणाले.
'महाराष्ट्रात डिसेंबर २०१३ ला महाराष्ट्र विधानसभेत अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक पारित झालं होतं. त्यावेळी ज्याआमदारांनी हे विधेयक पारित केलं असेल. त्यातील अनेक जण आजदेखील आमदार असतील. किती हा दुर्दैवी विरोधाभास आहे. महाराष्ट्राचं किती अधःपतन झाल्याचे हे द्योतक आहे. अशोक खरात स्त्रियांचं शोषण करतोय, ते झालं तरी चालेल. त्याच्या बदल्यात कुठल्यातरी शक्तीने तो आपलं भलं करेल, असा अजब विश्वास व्यक्त करतोय. त्यासाठी कोडगेपणा हे दोन्ही या राज्यात कुठून आला आहे हेच कळत नाही, असे राज ठाकरे पुढे म्हणाले.
'दैवी शक्तीच्या नावाखाली आणि राजसत्तेच्या आशीर्वादाने स्त्रियांचं शोषण होत असेल तर याच्या इतकं गंभीर काहीच नाही. याला जर वेळीच आवर नाही घातला तर महाराष्ट्र राज्याचं वाटोळं झालं म्हणून समजा. या प्रकरणातले सगळे दोषी शोधून काढा. त्यांना ठेचून काढा. तुम्ही ते केलंत तर आणि तरच तुमच्या भाषणामध्ये संतांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देण्याचा अधिकार आहे. अन्यथा नाही, असेही परखड मत राज ठाकरेंनी व्यक्त केले.