सागर आव्हाड| पुणे, ता. ३ ऑगस्ट २०२४
लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या काँग्रेसने विधानसभेची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशातच पुणे काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या बदलीसाठी स्थानिक नेत्यांनी थेट दिल्लीवारी केल्याचे समोर आले आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला पुण्यामध्ये अपेक्षित यश मिळाले नाही. पुण्यामध्ये काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांना लोकसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने पराभव स्विकारावा लागला. या पराभवानंतर पुण्यामधील काँग्रेस संघटनेमध्ये बदल करण्याची मागणी स्थानिक नेते करत आहेत.
येणाऱ्या विधानसभा, महापालिका निवडणूकांच्या दृष्टीने काँग्रेसला पुण्यामध्ये सक्षम करण्यासाठी तातडीने नेतृत्वात बदल करण्याची गरज आहे, अशी मागणी काँग्रेसमधील एका शिष्टमंडळाने पक्षाचे राज्य प्रभारी रमेश चेन्निथला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली होती. मात्र या मागणीनंतरही कोणतीही हालचाल न झाल्याने काँग्रेस शिष्टमंडळाने थेट दिल्लीमध्ये पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली.
यावेळी झालेल्या बैठकीत मल्लिकार्जुन खरगे यांनी विधानसभा निवडणुकांबाबत या शिष्टमंडळाशी चर्चा केली. तसेच राज्य सरकारविरोधात असलेल्या परिस्थितीचा कसा उपयोग करुन घेता येईल? याबाबत चर्चा झाली असून पुण्यातील शहराध्यक्ष बदलावा याबाबतचे निवेदन देखील देण्यात आले आहे. यावेळी पक्षातील वरिष्ठांनी शहराध्यक्षपदासाठी कोणता पर्याय उपलब्ध आहे. असं विचारलं असता माजी नगरसेवक राहिलेल्या चंदू कदम यांचे नाव पुढे आल्याचेही सांगण्यात येत आहे.
माजी मंत्री, माजी शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वात हे शिष्टमंडळ खरगे यांच्या भेटीला गेले होते. या शिष्टमंडळात रमेश अय्यर, चंदू कदम, जयंत किराड,नुरद्दीन इनामदार, विजय खळदकर, विशाल मलके , गौरव बोर्डे, यशराज पारखी, रामदास मारणे, गणेश जाधव, शानी नौशाद या काँग्रेसच्या आजी- माजी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.