वरंधा घाट २५ मार्च ते ३० एप्रिल बंद
रस्त्याच्या कामासाठी निर्णय
ताम्हिणी आणि आंबेनाळी घाट हे पर्यायी मार्ग
सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक बंद
सचिन जाधव, पुणे
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी. भोर, महाड मार्गावरील वरंध घाट रस्ता २५ मार्च २०२६ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत सुमारे सव्वा महिना वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. हिर्डोशी ते वरंधा दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे कामाच्या अनुषंगाने सुरक्षेच्या कारणास्तव हा रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या संदर्भात आदेश काढले आहेत.
हिर्डोशी ते वरंधा हा दरड प्रवण भाग असून, या भागात अनेक ठिकाणी वेडीवाकडी आणि धोकादायक वळणे आहेत. एकूण २१.१० कि.मी. लांबीच्या कामापैकी सुमारे ३.५० कि.मी. भागात वाहतूक वळवून डीएलसीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र उर्वरित भागात एका बाजूला नीरादेवघर धरणाचे पाणी आणि दुसऱ्या बाजूला उंच डोंगर असल्याने वाहतूक वळविण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही.
येणारा पावसाळा लक्षात घेऊन घाटातील उर्वरित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून हा घाटमार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यातं आला आहे. या कालावधीत महाड-कोकणाकडे जाणाऱ्या वाहनचालक आणि प्रवाशांनी ताम्हिणी घाट आणि महाबळेश्वर - आंबेनाळी घाट या पर्यायी रस्त्यांचा वापर करावा असे आवाहन करण्यात आलं आहे.
या दरम्यान स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन, स्थानिकांसाठी हा रस्ता पूर्णपणे बंद न ठेवता आवश्यक त्या ठिकाणी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.