मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण यांनी एक खळबजनक ट्विट केलं आहे. प्रकाश आंबेडकर हे राजकीय हनीट्रॅप असून त्यांना भाजपने पाठवलं आहे. माझ्या मते ते महाविकासआघाडीला राजकीय जाळ्यात अडकवण्यासाठी आले आहेत, असं ट्विट सूरज चव्हाण यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Maharashtra Political News)
नुकतीच वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यात युती झाली. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत या युतीची घोषणा केली. या युतीमुळे आगामी काळात राज्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)
दरम्यान, वंचित बहुजन आघाडी हा पक्ष भाजपाची बी टीम आहे, असा आरोप केला जातो. त्यातच आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या ट्विटमुळे खरचं प्रकाश आंबेडकर हे राजकीय हनीट्रॅप आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
काय म्हणाले सूरज चव्हाण?
'महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) नेत्यांनी अजूनही समजून घ्यावं प्रकाश आंबेडकर हे भाजपकडून पाठवलेले राजकीय हन्नी ट्रॅप आहेत.माझ्या मते ते आघाडीला राजकीय जाळ्यात अडकवण्यासाठी आले आहेत.प्रकाश आंबेडकरांनी दुसऱ्यावर बोलताना समाजातील स्वतःची विश्वासार्हता तपासून बोलावे', असं सूरज चव्हाण यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांचं सूचक ट्विट
सूरज चव्हाण यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा एक सूचक ट्विट केलं आहे. 'महाविकास आघाडी मधील घटक पक्षातील नेतृत्वाने किंवा त्यांच्या मित्रपक्षातील नेतृत्वाने शरद पवार साहेबांबद्दल बोलताना आदराने बोलावं. मतभेद सगळ्यांचेच असतात, पण त्याच्यातून विष ओकलं जाऊ नये. हे पटण्यासारखं नाही.तेव्हा सगळ्यांनीच काळजी घ्यावी.सत्तेसाठी वाटेल ते सहन करणार नाही', असं आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.