रायगड जिल्ह्यातील खोपोलीनंतर पनवेलमध्ये व्होट चोरीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी रान उठवलयं. तर दुसरीकडे तिवसा विधानसभा मतदारसंघातील व्होटचोरीवरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूरही आक्रमक झालेत. नेमकी व्होटचोरी कशी झाली पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
देशात आणि राज्यात सध्या व्होट चोरीचा मुद्दा चांगलाच गाजतोय. चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, पालघरनंतर आता रायगड जिल्ह्यामधील मतदार यांद्यांमधील घोळ उघड झाला आहे. पनवेल विधानसभेत तब्बल 85 हजार 211 मतदारांनी दोनदा मतदान करून लोकशाहीला हरताळ फासल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाच्या बाळाराम पाटील यांनी केलाय.
पनवेल मतदारसंघात 85 हजार 211 नावे ही दुबार मतदारांची नोंदवण्यात आलेत. त्यापैकी 25 हजार 855 मतदारांची पनवेल मतदारसंघात दोनवेळा नाव असल्याचं उघड झालयं. तर पनवेल आणि उरण या दोन्ही ठिकाणी नावे असलेले 27 हजार 275 दुबार मतदार आहेत. ऐरोली या मतदारसंघात 16 हजार 96 तर पनवेल आणि बेलापूर मतदारसंघात दोनदा नावे असलेले 15 हजार 397 मतदार आहेत. त्याव्यतिरिक्त 588 मतदारांची नावं दुबार आहेत.. मात्र या मतदारांची कोणतीच माहिती उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाबही समोर आलीय.
दरम्यान याप्रकरणी माजी आमदार बाळाराम पाटील यांनी निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. तसेच हायकोर्टातही रिट पिटीशन दाखल केली होती. हायकोर्टानेही दुबार मतदारांची नावे कमी करण्याचे आदेश दिले होते. मात्र नावे वगळली गेली नाहीत. पनवेलजवळच्या खोपोलीतील प्रभाग क्रमांक 10 मध्येही 140 मतदारांची नावं दोनदा आल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केलाय. दुसरीकडे काँग्रेसच्या यशोमती ठाकूरांनीही तिवसा लोकसभा मतदारसंघात झालेल्या व्होटोचोरीवरून निवडणुक आयोगावर ताशेरे ओढलेत.
तिवसा लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघात 2014 साली 2 लाख 70 हजार 408 मतदारांची नोंद झाली. त्यानंतर 2014 ते 2019 मध्ये 25 हजार 584 मतांची वाढ झाली. त्यामुळे 2019 मध्ये 2 लाख 95 हजार 992 मतदारांची नोंद पाहयला मिळाली. त्यामुळे 2024 मध्ये 25 हजार मतदारांची सरासरी वाढ अपेक्षित असताना प्रत्यक्षात 2024 मध्ये मतदारसंख्येत 11 हजार 749 घट होऊन 2 लाख 84 हजार 243 मतदारांची नोंद करण्यात आली.
व्होटचोरीच्या मुद्यावरुन राजकीय वातावरण तापतंय. अशातच राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघातून मतदार याद्यांचा घोळ समोर आल्यानं व्होटचोरीचं हे तण संपूर्ण राज्यभर पसरल्याची शक्यता आहे. त्यामुळे दोनदा मतदान करणाऱ्यांना निवडणुक आयोग कसं रोखणार? मतदार याद्यांमधील घोळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी तरी दूर होणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलयं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.