मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर कोणत्याही शहरात जा...निष्पापांच्या मृत्यूचं तांडव सगळी सुरू आहे....एकीकडे मुसळधार पावसानं रस्ते तुंडब भरलेले असताना कुठे उघडं मॅनहोल, कुठे तुटलेली विजेची तार, तर कुठे खड्डे....महापालिकेतले बेपर्वा अधिकारी आणि कंत्राटदारांच्या' याच निष्काळजीपणामुळे महाराष्ट्रात तब्बल 6 निष्पापांचे बळी गेलेत...सामान्य माणसाच्या जिवाची किंमत पालिकेच्या लेखी शून्य झाली आहे का? असाच प्रश्न त्यामुळे निर्माण झालाय...
मुंबईतल्या साकीनाक्यातील उघड्या मॅनहोलमुळे 55 वर्षीय अस्लम शेखचा मृत्यू झाला...तरीही मुंबईत ठिकठिकाणी उघडे मॅनहोल पाहायला मिळतात...त्यामुळे आणखी किती जणांचे मृत्यू झाल्यावर पालिकेला जाग येणार, असा सवाल उपस्थित होतोय...दुसरीकडे मुंबईतल्याच चेंबूरमध्ये शाळा सुटल्यानंतर एका धावत्या स्कूल बसवर झाड कोसळून भीषण अपघात झाला.. त्यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला...पालिकेनं केलेल्या दुर्लक्षामुळे आणि झाडांच्या मुळाशी क्रॉक्रीटीकरण केल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला...
मिरा- भाईंदरमधील राई गावात तर मुसळधार पावसात धावत्या दुचाकीवर नारळाचे झाड कोसळले.. ज्यामुळे दुचाकीस्वार राहुल पाटील या तरुणाचा मृत्यू झालाय...मुंब्र्यातही पावसाच्या पाण्यात तुटून पडलेल्या विजेच्या तारेमुळे 17 वर्षीय मुलीला विजेचा धक्का बसला.. यात मुलीला जीव गमवावा लागला. विजेच्या तारा रस्त्यावर पडलेल्या असताना तो परिसर संरक्षित का करण्यात आला नाही? असा गंभीर प्रश्न निर्माण झालाय.
पुण्याच्या लोणी काठभोरमध्ये तर ठेकेदाराच्या निष्काळजीपणानं दोन वर्षीय सोहमचा सांडपाण्यासाठी खोदलेले खड्ड्यात पडून मृत्यू झाला... सांडपाण्याच्या खड्ड्याशेजारी कुठलीच सुऱक्षा ठेकेदारानं घेतली नसल्यानं चिमुकल्याला जीव गमवावा लागला..ज्यामुळे ग्रामस्थही आक्रमक झाले...उपराजधानी नागपुरातही मनपाच्या कंत्राटदाराची बेपर्वाई समोर आलीय. ताजबाग परिसरातील गौसिया कॉलनीत कंत्राटदाराने गटार लाईनसाठी खोदकाम करताना स्ट्रीट लाईटची भूमिगत केबल उघडी सोडली. ज्यामुळे रस्त्याने चालताना विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू झाला..
कळस म्हणजे, तब्बल दीड तास उलटल्यानंतरही पोलिस आणि पालिका कर्मचारी महिलेच्या मदतीसाठी घटनास्थळी पोहचले नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला...
- रस्त्यावरील खड्डे, उघडे मॅनहोल्स आणि तुटलेल्या विजेच्या तारांमुळे होणाऱ्या अपघाताला महापालिकेच्या आणि कंत्राटदारांच्या निष्काळजीपणा कारणीभूत आहे...हे अपघात नसून पालिकेने आणि कंत्राटदारांनी केलेले 'खून' आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जनतेकडून कोट्यवधी रुपयांचा टॅक्स वसूल करायचा आणि बदल्यात त्यांना मरणयातना द्यायच्या. हा कसला कारभार? 6 निष्पापांच्या मृत्यूनंतर तरी राज्यातल्या या श्रीमंत पालिकांना जाग येणार की निर्ढावलेलं प्रशासन असंच नागरिकांच्या जीवाशी खेळत करणार,हा खरा प्रश्न आहे. \
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.