मुंबईतील धरणांमधील पाणीसाठा ३७.७०% वर आला आहे
उन्हाळ्याचे दोन महिने बाकी असल्याने चिंता वाढली आहे
पाणी कपातीचा निर्णय एप्रिल अखेरीस होऊ शकतो
मनोरी डीसेलिनेशन प्रकल्प अद्याप पूर्णपणे सुरू नाही
मुंबईकरांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा कमी होत असून, आजच्या आकडेवारीनुसार एकूण उपयुक्त साठा केवळ ३७. ७० टक्के शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा किंचित जास्त असला तरी, उन्हाळ्याचे दोन मुख्य महिने शिल्लक असल्याने पालिकेसमोर पाणी नियोजनाचे नवे आव्हान उभे राहिले आहे.
मुंबईला दररोज ३,९०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. हायड्रोलिक इंजिनिअर विभागाने दिलेल्या अहवालानुसार तानसा, मोडक सागर यांसारख्या महत्त्वाच्या धरणांमधील साठा ३५ टक्क्यांच्या खाली घसरला आहे. २०२४ मध्ये याच काळात साठा केवळ २९.५७ टक्के होता. सध्या ५० टक्क्यांपेक्षा कमी साठा असल्याने पालिका प्रशासन राज्य सरकारकडे राखीव साठ्यातून पाणी मिळवण्यासाठी मागणी करण्याची शक्यता आहे. एप्रिलच्या अखेरीस आढावा घेऊन पाणीकपातीचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
मुंबईची भविष्यातील तहान भागवण्यासाठी महत्त्वाकांक्षी ठरलेला मनोरी येथील खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प अद्याप पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेला नाही. या प्रकल्पासाठी जवळपास १२ हेक्टर जागा निश्चित करण्यात आली असून, निविदा प्रक्रिया आणि तांत्रिक सर्वेक्षणाचे टप्पे पूर्ण झाले आहेत.
सीआरझेड परवानग्या, पर्यावरणाचे दाखले आणि प्रकल्पाचा वाढलेला खर्च त्यामुळे कामाची गती मंदावली आहे. या प्रकल्पातून सुरुवातीला दररोज २०० दशलक्ष लिटर पाणी गोडे करण्याचे उद्दिष्ट आहे, जे भविष्यात ४०० दशलक्ष लिटरपर्यंत नेले जाऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.