मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्याला हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे सकाळपासून घामाच्या धारांनी भिजलेल्या मुंबई, ठाणे आणि पालघरमधील नागरिकांना पावसाच्या धारांनी न्हाऊन निघावं लागू शकतं. हवामान विभागाने मुंबईला १८ सप्टेंबरपर्यंत जोरदार पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
गुरुवारी मुंबई, ठाणे परिसरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. मात्र वीकेंडपर्यंत मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची वाढलेली तीव्रता, दक्षिणेकडे सरकलेला मॉन्सून पूरक ठरल्याने राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
IMD ने गुरुवारी दिलेल्या अंदाजानुसार, मुंबईसाठी १८ सप्टेंबरपर्यंत 'यलो' अलर्ट जारी केला आहे. तर ठाणे आणि पालघरसाठी १७ सप्टेंबरसाठी 'ऑरेंज' अलर्ट म्हणजे मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. (Latest Marathi News)
पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
भंडारा, चंद्रपूर, बुलडाणा, चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या चार जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे.
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, बुलडाणा, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.