भाजपने पहिल्यांदाच मुंबई महानगरपालिकेवर सत्ता स्थापन केली आहे.
वॉर्ड क्रमांक १३२ मधील नगरसेविका रितू तावडे महापौरपदी विराजमान होणार.
महिला आरक्षण आणि प्रशासकीय अनुभव ठरला निर्णायक घटक
भाजपनं पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेची सत्ता मिळवली असून शनिवारी भाजपने महापौरपदाचा उमेदवार जाहीर केला. मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक १३२ मधून विजयी झालेल्या नगरसेविका रितू तावडे यांना भाजपने महापौरपदासाठी निवडले. दुसरीकडे उपमहापौरपदासाठी शिंदेसेनेचे नगरसेवक संजय घाडी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. याचदरम्यान भाजपच्या राजकीय खेळीची चर्चा होऊ लागलीय.
दरम्यान मुंबई महानगरपालिकेत भाजप आणि शिवसेनेच्या युतीने ११४ हा बहुमताचा आकडा गाठल्याने रितू तावडे यांनी महापौरपदावरील निवड ही केवळ औपचारिकता मानली जातेय. मुंबईचे महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव झाल्यानंतर मुंबईची महापौर कोण होणार, कोणाला प्रथम नागरिकचा मान मिळणार याची उत्सुकता होती.
या शर्यतीमध्ये तेजस्वी घोसाळकर, शीतल गंभीर आणि रितू तावडे यांचा समावेश होता. मात्र अखेरच्या क्षणी रितू तावडे यांनी या शर्यतीमध्ये बाजी मारली. भाजपनं रितू तावडे यांच्या निवड का केली याची कारणे जाणून घेऊ. दरम्यान रितू तावडेंचा प्रशासकीय अनुभव सर्वाधिक असल्याने त्यांचे पारडे जड ठरल्याचे म्हटले जातंय.
रितू तावडे घाटकोपरमधील प्रभाग क्रमांक १३२ मधून निवडून आल्या आहेत. हा भाग प्रामुख्याने गुजराती बहुल आहे. याचमुळे भाजपसाठी हा सर्वांत मोठा मास्टरस्ट्रोक आहे. भाजपला मराठी मतदारांची सहानुभूती मिळेलच.पण गुजराती मतदारांमध्येही आपला प्रतिनिधी सर्वोच्च पदावर असल्याचा विश्वास निर्माण होण्याच मदत निर्माण झालीय. रितू तावडे या मराठा समाजातील आहेत. मात्र भाजपने त्यांना आपल्या गुजरातीबहुल बालेकिल्ल्यातून निवडून आणत थेट महापौरपदावर बसण्याची संधी दिलीय.
दरम्यान रितू तावडे यांची ही नगरसेवक म्हणून दुसरी टर्म आहे. याआधी त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपद अत्यंत प्रभावीपणे भूषवलंय.
महापालिकेतील गुंतागुंतीचे विषय आणि प्रशासकीय कामकाज हाताळण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केलेत. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांवर त्यांची वचक आहे.
रितू तावडे या मराठी असल्याने त्यांच्या रूपाने एक खंबीर मराठी चेहरा भाजपने महापौरपदाच्या शर्यतीत उतरवला.
रितू तावडे या अनुभवी तर आहेच शिवाय त्या आक्रमक वक्त्या म्हणूनही ओळखल्या जातात.
नगरसेवक पदाच्या दोन टर्ममध्ये रितू तावडे यांची प्रतिमा स्वच्छ राहिली आहे.
१८ एप्रिल १९७३ रोजी जन्मलेल्या रितू तावडे यांचे शिक्षण एस.वाय.बी.कॉम पर्यंत झाले आहे. त्यांचे पती राजेश तावडे हे उद्योजक आहेत. घाटकोपर येथील प्रभाग क्रमांक १३२ मधून दुसऱ्यांदा नगरसेविका म्हणून त्या निवडून आल्या आहेत. यासह रितू तावडे भाजपच्या अभ्यासू नेत्या मानल्या जातात. रितू तावडे यांनी मुंबई मनपाच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपद भूषवले आहे. भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष आणि ईशान्य मुंबई महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष राहिल्या आहेत. सध्या त्या मुंबई महिला मोर्चा कार्यक्रम समितीच्या संयोजिका आहेत. दरम्यान घाटकोपरमधील पाणी टंचाई दूर करण्यासाठी रितू तावडे यांनी काढलेला ‘हंडा मोर्चा’ अत्यंत गाजला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.