मुंबईची लाइफलाइन होतेय 'डेथलाइन'
मागील आठ वर्षांत ८ हजारांहून अधिक प्रवाशांचा मृत्यू
रेल्वे रुळ ओलांडताना किंवा धावत्या लोकलमधून पडून दरवर्षी शेकडोंचा जातोय जीव
लोकलगर्दी कमी करण्याचे रेल्वे प्रशासनाचे प्रयत्न
देशाची आर्थिक राजधानी आणि मायानगरी मुंबईची लाइफलाइन अशी ओळख असलेली ट्रेन ही 'मृत्यूची ट्रेन' ठरतेय. देशात सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या आणि घड्याळाच्या काट्याप्रमाणं धावणाऱ्या याच मुंबईतील रेल्वे प्रवाशांच्या मृत्यूची आकडेवारी मन छिन्नविछिन्न करणारी आहे. मध्य रेल्वेनं मुंबई उच्च न्यायालयात यासंबंधी माहिती दिली आहे.
गेल्या आठ वर्षांत रेल्वेशी संबंधित अपघातांमध्ये ८२७३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. २०२५ सालच्या पहिल्या पाच महिन्यांत ४४३ जणांचा बळी गेला आहे. रेल्वेरुळ ओलांडताना किंवा धावत्या ट्रेनमधून पडून त्यांचा मृत्यू झाल्याचं उघड झालं आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाकडून मुंबई उच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. यात रेल्वे अपघातांमध्ये प्रवाशांच्या मृत्यूची आकडेवारी देण्यात आली. २०१८ मध्ये रेल्वे रुळ ओलांडतानाचा १०२२ आणि धावत्या ट्रेनमधून पडून ४८२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. २०१९ मध्ये ९२० जणांचा रेल्वे रुळ ओलांडताना आणि ४२६ जणांचा धावत्या ट्रेनमधून पडून मृत्यू झाला आहे. २०२० मध्ये रेल्वे रुळ ओलांडताना अपघात होऊन ४७१ जणांचा जीव गेला आहे. तसेच १३४ जणांचा मृत्यू लोकलमधून पडून झाला आहे.
वर्ष २०२१ - रेल्वे रुळ ओलांडताना मृत्यू - ७४८ - धावत्या ट्रेनमधून पडून १८९ प्रवाशांचा मृत्यू
वर्ष २०२२ - रेल्वे रुळ ओलांडताना ६५४ बळी, धावत्या ट्रेनमधून पडून ५१० प्रवासी मृत्युमुखी
वर्ष - २०२३ - रेल्वे रुळ ओलांडताना ७८२ जणांचा मृत्यू, धावत्या लोकलमधून पडून ४३१ जणांचा बळी
वर्ष २०२४ - रुळ ओलांडताना अपघातात ६७४ जणांचा मृत्यू झाला असून, धावत्या ट्रेनमधून पडून ३८७ जणांचा मृत्यू
यावर्षी म्हणजेच २०२५ मध्ये आतापर्यंत २९३ जणांचा रेल्वे रुळ ओलांडताना मृत्यू झाला आहे. तर धावत्या लोकलमधून पडून १५० प्रवाशांचा बळी गेला आहे. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी याबाबत सांगितले की, लोकलमध्ये चढताना किंवा उतरतानाच नाही, तर रेल्वे रुळ ओलांडताना आणि अन्य कारणांमुळं हे अपघात होतात. रेल्वे प्रशासनाने लोकलमध्ये होणारी गर्दी कमी करण्यासाठी मुंबई आणि उपनगरांतील कार्यालयांना कामाच्या वेळा बदलण्याचा प्रस्तावही दिला आहे.
लोकलमधून पडून मृत्यू होण्याचे प्रमाणही जास्त आहे. लोकलगर्दी हे त्यामागचे एक कारण सांगितले जात आहे. त्यामुळं लोकलगर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने शेकडो कार्यालयांना कामाच्या वेळा बदलण्याच्या संदर्भात प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावाला अल्पप्रतिसाद असल्याचे समजते. दुसरीकडे कर्मचाऱ्यांना आठवड्याच्या मधल्या दिवशी वीक ऑफ दिले जावेत, जेणेकरून लोकलमधील गर्दी कमी होण्यास मदत होईल.
मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या वर्षाच्या अखेरीपर्यंत नॉन एसी ऑटोमेटिक डोअर असणाऱ्या ट्रेनची निर्मिती होणार आहे. त्यामुळे लोकलच्या दरवाजातून प्रवास करण्याचे प्रमाण कमी होईल. सद्यस्थितीत मध्य रेल्वेकडे १२ डब्यांचे १५६ रॅक, १५ डब्यांच्या दोन रॅक आणि ७ एसी लोकल ट्रेन आहेत. त्याच्या दिवसाला १७०० हून अधिक फेऱ्या होतात.
मुंबईच्या लोकलमध्ये सकाळी आणि संध्याकाळच्या सुमारास प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. लोकलच्या दरवाज्यातही पाय ठेवायला जागा नसते. दुपारच्या सुमारास गर्दी कमी असली तरी काही प्रवासी लोकलच्या दरवाजात उभे राहून प्रवास करतात. त्यामुळे शेकडो लोकांचा लोकलच्या दरवाजातून पडून मृत्यू झाला आहे. लोकलच्या दरवाजात उभं राहून प्रवास करू नका, असं आवाहन वारंवार करण्यात येत असलं तरी, या सूचनांकडं सर्रास दुर्लक्ष करण्यात येतं, असंही निदर्शनास आल्याचं सांगितलं जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.