Mumbai Congress suspends 79 former leaders for six years : पक्षाविरोधात काम केल्याचा आरोप करत मुंबई काँग्रेसने ७९ माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना ६ वर्षांसाठी निलंबित केलं आहे. धक्कादायक म्हणजे, निलंबित केलेल्या नेत्यांच्या यादीतील अनेक नेते आधीच भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढले आहेत, तर काहींनी वर्षभरापूर्वीच पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे मुंबई काँग्रेसच्या या निर्णयामुळे नवा राजकीय वाद सुरू झाला आहे. काँग्रेसच्या या निर्णयावर आता माजी नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना थेट कायदेशीर नोटीस पाठवण्याचा इशारा काही नेत्यांनी दिला आहे. याबाबत TOI ने वृत्त प्रसारित केले आहे.
मुंबई काँग्रेसच्या या विचित्र आणि वादग्रस्त निर्णयामुळे नवा राजकीय गदारोळ सुरू झाला. पक्षाविरोधी कारवाया केल्याचा आरोप करत मुंबई काँग्रेसने माजी नगरसेवकांसह ७९ पदाधिकाऱ्यांची पक्षातून ६ वर्षांसाठी हकालपट्टी (निलंबन) केली आहे. निलंबित करण्यात आलेल्या ७९ जणांच्या यादीत माजी नगरसेवक रवी राजा आणि धर्मेश व्यास यांच्यासारख्या बड्या नावांचा समावेश आहे.
रवी राजा यांनी २०२४ मध्येच काँग्रेस सोडली असून ते सध्या भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. त्यांनी भाजपच्या तिकिटावर धारावीतून निवडणूकही लढवली आहे. काँग्रेसच्या निलंबनावर टीका करताना ते म्हणाले, "मी भाजपचा उपाध्यक्ष आहे आणि निवडणूकही लढलो आहे. तरीही वर्षा गायकवाड यांना हे माहीत नसावे का? हे हास्यस्पद आहे."
धर्मेश व्यास यांनी एका वर्षापूर्वीच काँग्रेसचा राजीनामा दिलेला आहे. त्यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांना मानहानीची आणि कायदेशीर नोटीस पाठवण्याचा इशारा दिला आहे.
काँग्रेस पक्षाचे काय स्पष्टीकरण आहे?
या वादावर बोलताना मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड म्हणाल्या की, "आमच्या पक्षात लोकशाही आहे. कोणी कायदेशीर नोटीस पाठवत असेल किंवा उत्तर देत असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे. हा पक्षाचा अंतर्गत विषय असून आम्ही तो हाताळू."
काँग्रेसमधील सूत्रांनी TOI ला दिलेल्या माहितीनुसार, हकालपट्टीचा निर्णय गायकवाड यांनी नव्हे, तर पक्षाच्या प्रशासकीय मंडळाने घेतला होता. अनेक नेत्यांनी पक्षाकडे अधिकृत राजीनामा न देता फक्त सोशल मीडियावर पोस्ट टाकून पक्ष सोडला होता. त्याशिवाय, पक्ष सोडलेले काही नेते पुन्हा पक्षात येण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे पक्षाच्या प्रशासकीय कमिटीने कायदेशीर प्रक्रिया (कारण दाखवा नोटीस) पूर्ण करून या सर्व ७९ जणांना पुढील ६ वर्षांसाठी पक्षात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेसकडून विधानसभेचे तिकीट नाकारल्यानंतर आणि मुंबई काँग्रेस नेतृत्वाविरोधात तक्रार करण्यासाठी दिल्लीत राहुल गांधी यांनी भेट न दिल्याने, रवी राजा यांनी २०२४ मध्येच काँग्रेस सोडली होती. त्यानंतर ते भाजपमध्ये दाखल झाले असून सध्या ते मुंबई भाजपचे उपाध्यक्ष आहेत. काँग्रेसच्या कारवाईवर बोलताना राजा म्हणाले, 'मी भाजपच्या तिकिटावर धारावीतून निवडणूकसुद्धा लढवली आहे. तरीही वर्षा गायकवाड इतक्या अज्ञातासारख्या कशा वागू शकतात? काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीच आम्हाला बाजूला फेकून दिले होते, त्यामुळे आम्हाला आधीच पक्ष सोडावा लागला. आता हे निलंबन हास्यस्पद आहे. वर्षा गायकवाड यांना कायदेशीर नोटीस पाठवणार आहे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.