१ सप्टेंबरपासून मुंबईत रिक्षा-टॅक्सी प्रवास महागणार
रिक्षाचे किमान भाडे ₹२६ वरून ₹२७ होणार
काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे किमान भाडे ₹३१ वरून ₹३३ होणार
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, वसई-विरार आणि पालघर या भागांमध्ये भाडेवाढ लागू होणार
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता तुम्ही रिक्षा किंवा टॅक्सीने प्रवास करत असाल तर तुमच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. कारण येत्या १ सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ होणार आहे परिवहन आयुक्तांनी सादर केलेल्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने (MMRTA) मंजुरी दिली आहे.
नव्या दरानुसार, रिक्षाच्या किमान भाड्यात १ रुपयांची, तर काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या किमान भाड्यात २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सध्या रिक्षासाठी पहिल्या दीड किलोमीटरचे किमान भाडे २६ रुपये आहे. १ सप्टेंबरपासून हे भाडे २७ रुपये होईल. त्याचप्रमाणे काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे किमान भाडे ३१ रुपयांवरून ३३ रुपये करण्यात आले आहे.
ही भाडेवाढ केवळ मुंबईपुरती मर्यादित नसून मुंबई महानगर प्रदेशातील विविध भागांमध्ये लागू होणार आहे. यामध्ये ठाणे, नवी मुंबई, कल्याण, वसई, विरार आणि पालघर या भागांचा समावेश आहे. त्यामुळे या भागात नियमितपणे रिक्षा किंवा टॅक्सीने प्रवास करणाऱ्या नागरिकांना पुढील महिन्यापासून अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
रिक्षा आणि टॅक्सी संघटनांकडून गेल्या काही काळापासून भाडेवाढीची मागणी करण्यात येत होती. इंधनाच्या किमती, वाहनांची देखभाल आणि दुरुस्ती, विमा हप्ते तसेच परवाना आणि इतर परिचालन खर्चात वाढ झाल्याचा मुद्दा चालक संघटनांनी मांडला होता. वाढत्या खर्चाच्या तुलनेत चालकांचे उत्पन्न पुरेसे नसल्याने भाडेवाढ आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, याआधी फेब्रुवारी 2025 मध्ये रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा भाडेवाढ मंजूर झाल्याने नागरिकांच्या बजेटवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.