मुंबईत कधी लोकलमधून पडून प्रवाशांचा मृत्यू होतो. तर कधी ट्रॅकवर लोकलला धडकून बळी जातो. मात्र लोकलच्या प्रवाशांसोबत आज जे घडलं ते ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही. थंडगार प्रवासासाठी जर तुम्ही एसी लोकलनं प्रवास करत असाल तर ही बातमी नक्की पाहा, सात पट अधिक पैसे देऊनही रेल्वे प्रवाशांचा जीवावर संकट कशामुळे आलं? पाहा हा रिपोर्ट.
मुंबईतल्या लोकलमध्ये अनेक मुंबईकरांचा श्वास रोखला गेला होता, लोकलमध्ये मुंबईकरांची हवा बंद झाली. हवेतला ऑक्सिजन गायब झाल्यानं एकापाठोपाठ एक असे 3 जण बेशुद्ध होऊन धडाधड खाली कोसळले. हे सगळं चित्रपटातील सीन सारखं घडलं आपल्या मुंबईत.
ठिकाण -
फलाट क्रमांक 2
मुलुंड रेल्वे स्थानक
वेळ
सकाळच्या गर्दीची
उकाड्याने अंगाची लाही लाही होत असताना, चार पैसे जास्त मोजून मुंबईकर एसी लोकलचा आसरा घेतात. टिटवाळ्याहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या प्रवाशांनी गच्च भरलेल्या एसी लोकल मध्ये अचानक एक भयंकर घटना घडली. थंडगार वाटणारी एसी लोकल अचानक हवाबंद डबा बनली. चालू ट्रेनमध्ये एसी पूर्णपणे बंद पडला. जवळपास २५ मिनिटं प्रवाशांना या बंद डब्यात ऑक्सिजनच मिळेनासा झाला.
दमट हवा, घामाच्या धारा अन् श्वास गुदमरल्यामुळे प्रवाशांचा जीव कंठाशी आला. ३ प्रवासी बेशुद्ध झाल्यानं घाबरलेल्या इतर प्रवाशांनी ही लोकल मुलुंड स्थानकात थांबवली. हवेसाठी तडफडणाऱ्या या प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी मुंबईकरांनी मात्र जिवाची बाजी लावली कुणी हवा घालत होतं, तर कुणी पाणी पाजत होतं. दुर्दैव असं की, तिघांपैकी एका प्रवाशाची प्रकृती इतकी खालावली की त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करावं लागलं.
नेहमी प्रमाणे रेल्वेनं कोरडी प्रतिक्रीया देऊन प्रवाशांप्रती असलेला आपला कोडगेपणा दाखवला. पण या घटनेची जबाबदारी काही स्विकारली नाही. आज गर्दीच्या वेळी घडलेली ही घटना अनेक संभाव्य धोक्यांची चाहूल देऊन गेली. आज सुदैवाने जीव वाचले, पण गर्दीच्या वेळी घडलेली ही घटना एका मोठ्या अनर्थाची नांदी तर नाही ना? असा सवाल केला जातोय.
लोकलचा एसी नादुरुस्त होता तर ती लोकल सेवेत का आणली?
एसी बंद पडल्यानंतर लोकलची दारं का उघडली गेली नाहीत?
लोकलमधील एसी बंद पडल्यानंतर आपातकालीनं खिडक्या उघडण्याची सोय का नाही?
मुलुंड स्थानकात घडलेली ही घटना म्हणजे मुंबईकरांच्या जीवावर उठलेल्या निष्काळजीपणाचा जिवंत पुरावाये. तब्बल ७ पट जास्त भाडं मोजूनही एसी लोकलमध्ये प्रवासी गुदमरत असतील तर रेल्वेला प्रवाशांच्या सुरक्षेचं कोणतंही सोयरसुतक नाही. आतापर्यंत उघड्या दारातून पडून मुंबईकर मरत होते. आता बंद दारांच्या एसी लोकलमध्ये गुदमरण्याचा धोका आहे. कारण मुंबईत एसी लोकलच्या फेऱ्या तर वाढवल्या जाणारच आहे. पण आता बंद दाराच्या लोकलही सेवेत येणारेत. त्यामुळे भविष्यात काही अघटीत घडू नये यासाठी आताच खबरदारी घेण्याची गरज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.