गेल्या शनिवारपासून पावसाने चांगलाच जोर धरला होता. अशातच लोणावळा कर्जत घाट परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने १० जुलै ते १७ जुलै या कालावधीत २२ नियमित आणि ८ विशेष अशा एकूण ३० गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचं काम सुरू असलं तरी तिन्ही रेल्वे मार्ग पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी अजून काही काळ लागण्याची शक्यता आहे.
दरडीमुळे रुळांवर साचलेली माती-दगडांचा ढिगारा हटवणं आणि नुकसान झालेल्या रेल्वे रुळांची दुरुस्ती करण्यासाठी १,१०० हून अधिक रेल्वे कर्मचारी दिवस-रात्र काम करतायत. यापैकी एक रेल्वे मार्ग सुरू करण्यात यश आलं असून त्यावरून मर्यादित प्रमाणात गाड्या चालवल्या जातायत. मात्र उरलेल्या दोन मार्गांचं मोठं नुकसान झाल्याने त्यांची दुरुस्ती अजूनही सुरू आहे.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी सांगितलं की, दुरुस्तीचं काम वेगाने सुरू आहे. मात्र सर्व मार्ग पूर्णपणे सुरू होण्यासाठी आणखी काही वेळ लागणार आहे. त्यामुळे १७ जुलैपर्यंत अनेक नियमित आणि विशेष रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
सेवा विस्कळीत असली तरी मुंबई आणि पुणेदरम्यान काही महत्त्वाच्या गाड्या सुरू ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रगती एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस, सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस आणि सिंहगड एक्स्प्रेसचा समावेश आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करण्यासाठी मर्यादित पर्याय उपलब्ध आहेत.
दरम्यान रेल्वे प्रशासनाने असं आवाहन केलंय की, प्रवासासाठी निघण्यापूर्वी तुमच्या गाडीची माहिती रेल्वेच्या अधिकृत मोबाईल अॅपवर, रेल्वे हेल्पलाईनवर किंवा मध्य रेल्वेच्या अधिकृत सोशल मीडियावर तपासूनच प्रवास करावा.
दोन्ही दिशेने रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये खाली दिलेल्या गाड्यांचा समावेस आहे-
हुबळी–दादर एक्स्प्रेस
इंदूर–दौंड एक्स्प्रेस
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)–हैदराबाद एक्स्प्रेस
डेक्कन क्वीन
डेक्कन एक्स्प्रेस
CSMT–पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस
CSMT–चेन्नई एग्मोर सुपरफास्ट मेल
याशिवाय काही ठराविक दिवशी महालक्ष्मी एक्स्प्रेस, जोधपूर-हडपसर एक्स्प्रेस, सातारा-दादर एक्स्प्रेस आणि दादर-साईनगर शिर्डी एक्स्प्रेसही रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे CSMT-गोरखपूर, पुणे-गोरखपूर, पुणे-गाझीपूर सिटी आणि पुणे-हजरत निजामुद्दीन या विशेष गाड्याही या कालावधीत रद्द करण्यात आल्यात.
कर्जत आणि लोणावळा दरम्यानचा बोर घाट हा मध्य रेल्वेच्या दृष्टीने पावसाळ्यातील सर्वात सेंसेटीव्ह आणि आव्हानात्मक रेल्वे मार्ग मानला जातो. मुसळधार पाऊस पडला की याठिकाणी अनेकदा दरड कोसळते. तसंच रुळाखालील खडी वाहून गेल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत होते.
ऑगस्ट २०१९ मध्ये मंकी हिल आणि ठाकूरवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्यामुळे मुंबई–पुणे रेल्वे मार्ग सलग १३ दिवस बंद ठेवावा लागला होता. त्या वेळी ४०० हून अधिक लांब पल्ल्याच्या आणि उपनगरी रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.