विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम
अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४६.९°C तापमान
यवतमाळमध्ये सर्वाधिक उष्णतेची नोंद
३० एप्रिलपर्यंत उष्णतेचा तडाखा कायम राहण्याची शक्यता
राज्यात पूर्व मोसमी पावसाचा प्रभाव कमी होताच तापमानात झपाट्याने वाढ झाली असून, विदर्भात उष्णतेची तीव्र लाट उसळली आहे. अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४६.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर अमरावतीत ४६.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच बदलत्या हवामानामुळे आणि उकाड्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाने आज (ता. २७) अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. या भागांत पुढील काही तासांत तापमान अधिक वाढण्याची शक्यता असून, नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर बुलडाणा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे, ज्यामुळे उष्णतेचा प्रभाव कायम राहणार असल्याचे संकेत आहेत.
दरम्यान, उर्वरित महाराष्ट्रात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र ढगाळ वातावरण असूनही उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांना दिलासा मिळण्याची चिन्हे कमी आहेत. हवामान तज्ञांच्या मते, उत्तर कर्नाटकपासून कोमोरीन भागापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने वातावरणात बदल होत आहेत आणि त्याचा परिणाम राज्यातील तापमानावर दिसून येत आहे.
यवतमाळ जिल्ह्याचे तापमान सर्वाधिक उच्चांकी तापमान म्हणून नोंदविले गेले असून दशकातील काही उच्चांकी तापमानाच्या नोंदीमध्ये नोंद झाली आहे. 46 अंशावर पारा पोचला. तापमानाची ही लाट हिट वेव्ह 30 एप्रिल पर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. एप्रिल महिन्यातच उष्णतेची लाट आली असून मे हिटचा तडाखा बसतोय. दिवसा सूर्य आग ओकत असला तरी रात्रीचेही तापमान वाढले आहे. विदर्भातील सर्वात उष्ण रात्रही यवतमाळ जिल्ह्यात ठरली असून रात्रीचे तापमान 30 अंशावर पोहचले आहे.
वाशिममध्ये सध्या उन्हाचा तीव्र प्रकोप जाणवत असून वाशिम जिल्ह्यात आतापर्यंतची सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. काल रविवारी तापमानाने विक्रमी 44.6 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून दैनंदिन जीवनावर त्याचा मोठा परिणाम होत आहे. सकाळी ९ वाजतापासूनच उन्हाचे चटके बसायला सुरुवात होत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण होत आहे. दुपारी १ वाजल्यानंतर तापमानात आणखी वाढ होत असून, या काळात रस्त्यांवरील वर्दळ लक्षणीयरीत्या कमी होत आहे. अत्यावश्यक कामाशिवाय नागरिक घराबाहेर पडणे टाळत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.