मार्चच्या पहिल्या आठवड्यातच ठाण्यात तापमान ४० अंशांवर.
हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला.
दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे नागरिकांसाठी कठीण.
मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ठाणे शहरात उन्हाचा तडाखा वाढू लागला असून मंगळवारी तापमानाने तब्बल ४० अंश सेल्सियसचा टप्पा गाठला. त्यामुळे दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे ठाणेकरांसाठी त्रासदायक ठरत असून येत्या काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा ठाणेकरांसाठी अधिक तापदायक ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
पहाटेच्या वेळी हवेत किंचित गारवा जाणवत असला तरी सकाळीच उन्हाचा चटका वाढू लागतो. दुपारपर्यंत उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने रस्त्यांवर वर्दळही काहीशी कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. एरवी कमाल ३४ ते ३५ अंश सेल्सियस तापमान असणाऱ्या ठाणे शहरात यंदा तापमानात ४ ते ५ अंशांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सध्या कमाल तापमान ३८ ते ४० अंशांदरम्यान झेपावत असल्याने नागरिकांना उकाड्याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.
ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार शहरात किमान तापमान २६ अंश तर कमाल तापमान ४० अंश सेल्सियस इतके नोंदवण्यात आले आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडताना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उन्हाळ्यात शक्यतो जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक असून हलके व सूती कपडे वापरण्याचा सल्ला देण्यात येत आहे. बाहेर पडताना गॉगल्स, टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, लिंबूपाणी, ताक, लस्सी यांसारख्या पेयांचे सेवन करावे, असे ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.