Maharashtra to Get Third and Fourth Mumbai: मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे मुंबईची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते. तर ठाणे-रायगड पट्ट्यावरील नवी मुंबईला मुंबईसारखे विकसित करण्यात आले. मुंबईतील गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने नवी मुंबईचा विकास करण्यात आला. पण भविष्यातील गर्दी अन् इतर गोष्टींचा विचार करता तिसरी आणि चौथी मुंबई विकसित करण्यात येणार आहे. (Devendra Fadnavis Third and Fourth Mumbai announcement)
रायगड जिल्ह्यातील नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाभोवती (एनएमआयए) तिसरी मुंबई बांधली जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेली भेट असून याच ठिकाणी देशातील पहिले ऑफशोर विमानतळ तयार करण्यात येत आहे. त्याच ठिकाणी चौथी मुंबई तयार होणार आहे.
नवी मुंबई परिसरात ‘तिसरी मुंबई’ची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये ‘एज्यु सिटी’, ‘इनोव्हेशन सिटी’, ‘स्पोर्ट्स सिटी’ आणि ‘जीसीसी सिटी’ उभारण्यात येतील. ‘एज्यु सिटी’त १० ते १२ परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस येणार असून १ लाख विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळेल. या विद्यापीठांमध्ये जागतिक दर्जाच्या संस्था असणार आहेत. यामुळे नव्या शहराचा आणि नव्या अर्थव्यवस्थेचा विकास होणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. इनोव्हेशन सिटीमध्ये जागतिक स्तरावरील संशोधन व तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.
चौथी मुंबई ही वाढवण बंदर आणि पालघर जिल्ह्यातील वसवली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले की या भागात नवी मुंबईसारखेच आणखी एका आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ बांधले जात आहे. मुंबईच्या उत्तरेकडील भागात वाढवण येथे भारतातील सर्वात मोठा बंदर प्रकल्प उभारला जातोय. २० मीटर खोल ड्राफ्ट असलेले हे बंदर जगातील पहिल्या दहा बंदरांमध्ये गणले जाईल. त्याशिवाय, मुंबईचा तिसरे ऑफशोर विमानतळ आणि बुलेट ट्रेन स्टेशनही प्रस्तावित आहे. या प्रकल्पांमुळे मुंबई नवीन आर्थिक केंद्र म्हणून उदयास येणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबई ट्रान्स हार्बर लिंकसारखे विविध प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडलेले होते, परंतु ‘इन्फ्रास्ट्रक्चर वॉर रूम’च्या माध्यमातून निर्णय प्रक्रिया वेगात करण्यात आली. पूर्वी मुंबई मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला केवळ नियोजनासाठी सहा वर्षे लागली होती. मात्र आता ३७२ किमी मेट्रो नेटवर्कसाठी केवळ ११ महिन्यांत निविदा टप्प्यापर्यंत पोहोचलो आहेत. सन २०३० पर्यंत महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे ध्येय आहे. त्यासाठी ‘एमएमआर ग्रोथ हब इनिशिएटिव्ह’च्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशाला १.५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.